‘एक पक्षी’ गझलसंग्रहास समरसता साहित्य पुरस्कार २०२५ जाहीर
‘एक पक्षी’ गझलसंग्रहास समरसता साहित्य पुरस्कार २०२५ जाहीर
गझलकार सतिश मालवे यांचा गौरव
नांदेड :
सामाजिक समरसता आणि सर्जनशीलतेचा वारसा जपणाऱ्या समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र यांच्यातर्फे दिला जाणारा ‘समरसता साहित्य पुरस्कार २०२५’ यंदा प्रसिद्ध गझलकार सतिश गुलाबसिंह मालवे यांच्या ‘एक पक्षी’ या गझलसंग्रहाला जाहीर झाला आहे.
साहित्यिक सौंदर्य, सामाजिक भान, आणि आत्मनिष्ठ अनुभवांचे प्रभावी शब्दांकन यामुळे हा संग्रह वाचक आणि समीक्षकांच्या विशेष पसंतीस उतरला आहे. राज्यभरातून आलेल्या शेकडो साहित्य कृतींपैकी ‘एक पक्षी’ ही निवड ठळकपणे केली गेली असल्याची माहिती परिषदेकडून देण्यात आली.
या पुरस्काराचे वितरण २ व ३ ऑगस्ट २०२५ रोजी नांदेड येथे होणाऱ्या २० व्या समरसता साहित्य संमेलन २०२५ च्या उद्घाटन सोहळ्यात करण्यात येणार आहे. परिषदेकडून प्रसिद्ध निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, "साहित्यिक समरसतेचा प्रसार, सामाजिक सलोखा आणि नवोदित लेखकांना प्रोत्साहन देणे, हेच आमचे मुख्य ध्येय आहे."
सतिश मालवे, हे मूळचे अंजनगाव सुर्जी तालुक्यातील मुऱ्हा देवी (जि. अमरावती) येथील असून सध्या शिक्रापूर (पुणे) येथे वास्तव्यास आहेत. ‘सतिशसिंह’ या टोपणनावानेही ते साहित्य वर्तुळात ओळखले जातात. त्यांच्या लेखनशैलीत मातीचा गंध आदिम संस्कृतीचे दर्शन, आणि समकालीन सामाजिक जाणिवांचा प्रत्यय सातत्याने येतो.
या सन्मानानंतर राज्यभरातील साहित्यिक, अभ्यासक आणि रसिक वाचकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

