सतीश मालवे यांच्या एक पक्षी गझल संग्रहाला सलग तिसरा राज्यस्तरीय पुरस्कार

“एक पक्षी”ची पुरस्कार हॅट्ट्रिक; सतीश मालवे यांना आणखी एक राज्यस्तरीय मान

“एक पक्षी”ची पुरस्कार हॅट्ट्रिक; सतीश मालवे यांना आणखी एक राज्यस्तरीय मान

डोंबिवली : मराठी गझल क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय ठसा उमटवणारे गझलकार सतीश गुलाबसिंह मालवे यांच्या “एक पक्षी” या गझलसंग्रहाला सलग तिसरा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे. डोंबिवली येथील काव्यरसिक मंडळ तर्फे प्रदान करण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय कै. अनिल साठे स्मृती सर्वोत्कृष्ट गझलसंग्रह पुरस्कार २०२६ अंतर्गत विशेष “कै. अनिल साठे उल्लेखनीय गझलसंग्रह पुरस्कार” या संग्रहाला जाहीर करण्यात आला आहे.

हा पुरस्कार येत्या १ मार्च २०२६ रोजी डोंबिवली येथे आयोजित राज्यस्तरीय हीरक महोत्सवात मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. याबाबतची अधिकृत माहिती मंडळाचे कार्यवाहक व सुप्रसिद्ध गझलकार हेमंत राजाराम यांनी दिली.

विशेष म्हणजे, “एक पक्षी” या गझलसंग्रहाला अल्पावधीत मिळालेला हा तिसरा राज्यस्तरीय सन्मान आहे. यापूर्वी साहित्यकणा फाऊंडेशन, नाशिक तर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय स्व. मधुकर तांबोळी स्मृती सर्वोत्कृष्ट गझलसंग्रह पुरस्कार या संग्रहाला प्राप्त झाला होता. तसेच समरसता साहित्य परिषद महाराष्ट्र राज्य तर्फे २०२५ सालचा सर्वोत्कृष्ट गझलसंग्रह पुरस्कारही या संग्रहाला मिळाला आहे.

प्रकाशनानंतर वर्षपूर्तीही न झालेल्या या संग्रहाने सलग तीन राज्यस्तरीय पुरस्कार पटकावत मराठी गझल क्षेत्रात स्वतंत्र आणि भक्कम ओळख निर्माण केली आहे. आशयघनता, भावस्पर्शी अभिव्यक्ती, सामाजिक भान आणि संवेदनशील मांडणी ही या संग्रहाची वैशिष्ट्ये मानली जात असून रसिक व समीक्षकांकडून त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.

या यशाबद्दल बोलताना कवी सतीश मालवे यांनी आपल्या आई-वडिलांप्रती, गुरूजनांप्रती, वाचकवर्ग व समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त करत हा सन्मान त्यांना समर्पित केला असल्याचे सांगितले. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल साहित्यविश्वातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

नदीची धार दिसल्यावर करू शकतो_marathi gazhal by satish Malve

  नदीची धार दिसल्यावर करू शकतो_marathi gazhal by satish Malve 

Marathi gazhal by satish Malve





नदीची धार दिसल्यावर करू शकतो
तिचाही मी महासागर  करू शकतो

स्वतःला मानल्यावरती सिकंदर मी
हुकूमत पूर्ण विश्वावर करू शकतो

मला दिंडीत जाणे शक्य नाही.. पण
भजन कीर्तन विठोबावर करू शकतो

निराशेच्या ढगांनी व्यापल्यानंतर
व्यथांचे वेगळे अंबर करू शकतो

करू शकतो करू शकतो करू शकतो
मनामध्ये तुझ्या मी घर करू शकतो

तुला विश्वास नाही राहिला माझा
भरोसा कोण माझ्यावर करू शकतो

– सतीश गुलाबसिंह मालवे

Ek Pakshi Marathi gazal sangrah – Satish Malve एक पक्षी मराठी गझलसंग्रह – सतिश मालवे

Ek Pakshi Marathi gazal sangrah – Satish Malve एक पक्षी मराठी गझलसंग्रह – सतिश मालवे 

🌿 "एक पक्षी" – पहिली आवृत्ती संपल्याचा आनंदक्षण 🌿

आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आणि प्रेमामुळे माझा पहिला मराठी गझलसंग्रह "एक पक्षी" याची पहिली आवृत्ती संपली आहे.

माझ्यासारख्या छोट्या गझलकाराला एवढं अपरंपार प्रेम मिळेल, याची मी स्वप्नातसुद्धा कल्पना केली नव्हती.

हे यश तुमचं आहे — कारण प्रत्येक वाचक, प्रत्येक गझलप्रेमी आणि शुभचिंतकानेच या पक्ष्याला उंच भरारी दिली आहे.

🌿 एक पक्षी – गझल संग्रह 🌿

एक पक्षी पुस्तक मुखपृष्ठ सतिश गुलाबसिंह मालवे

📖 पुस्तकाची माहिती

  • लेखक: सतिश गुलाबसिंह मालवे
  • मुखपृष्ठ: संतोष घोंगडे
  • प्रकाशक: गझल मंथन प्रकाशन, कोरपना
  • किंमत: ₹200/-
  • संपर्क: 9527912625
  • पुरस्कार: 🏆संग्रहाला मिळालेला पहिला पुरस्कार समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य तर्फे[समरसता साहित्य पुरस्कार २०२५]

🕊 संग्रहाच्या शीर्षक गझलेतील दोन शेर

गावाकडून आला शहरात एक पक्षी
पडला अजून तेव्हा पेचात एक पक्षी
घेण्यास तो भरारी बाहेर येत असतो 
पाळून ठेवला मी हृदयात एक पक्षी 

📜 या संग्रहातील मान्यवरांच्या मनोगतातून

१. डॉ. शिवाजी काळे (राशीन, कर्जत )
सतीशजींची गझल मातीची माया, घामाचा सुगंध, आणि निरागस मनाची सच्चाई घेऊन येते...

२. श्री.निलेश कवडे (अकोला)
सुचलेले मांडण्याऐवजी सोसलेले मांडण्याच्या भूमिकेमुळे सतीश मालवे यांची गझल आपसूकच वैशिष्ट्यपूर्ण ठरते...

३. श्री. अनंत ढवळे (अमेरिका)
गझलेचा शेर सांगण्याचं / लिहिण्याचं काही एक कौशल्य आहे - त्यात विषयाची मांडणी, शब्दाची निवड ह्या खेरीज इतरही अनेक गोष्टी आहेत. शेर क्वचित प्रतिमानांमधून बोलतो तर कधी थेट बखानातून. सतिश मालवे ह्यांना शेरांची ही कला साधली आहे असे म्हणता येते. 

४. डॉ. स्नेहल कुलकर्णी
लिखाणातून सामाजिक प्रश्नांचा, दुःखांचा केवळ उदो उदो न करता, चिंतनशील पातळीवर जाऊन अपार मानवी करुणेने त्यांचा वेध घेण्याची धडपड सतीशजींच्या लेखणीतून उजागर होताना दिसते


🙏 मनःपूर्वक आभार तुमच्यापुढे 🙏

माझा आवडता गझलकार : गणेश नागवडे सर | maza aavdta gazalkar

माझा आवडता गझलकार : आ. श्री. गणेश नागवडे

✒️ रसिक – सतिश गुलाबसिंह मालवे


स्नेहगझल समूहामध्ये सुरू असलेल्या ‘माझा आवडता गझलकार’ या सुंदर उपक्रमासाठी संयोजिका अंजलीताई दीक्षित यांचे मन:पूर्वक आभार! त्यांनी या उपक्रमाला उत्तम प्रकारे हातभार लावला आणि माझ्यासारख्या अंतर्मुख रसिकालाही व्यक्त व्हायला प्रेरणा दिली. समूहात येणाऱ्या दर्जेदार पोस्ट पाहून मला देखील वाटले की मला या उपक्रमात सहभागी व्हावे, काहीतरी लिहावे.

मी एक वाचक, एक गझलप्रेमी म्हणून माझ्या आवडत्या गझलकाराची ओळख त्यांच्या शेरांमधून करून देण्याचा प्रयत्न करतो.

गझल म्हणजे केवळ शब्दांची कसरत नाही; ती हळव्या भावना, नाजूक संवेदना आणि अंतर्मनातील तरल पडसादांनी आकारलेली सर्जनशील अभिव्यक्ती आहे. जीवनाच्या प्रत्येक वळणावर गझल आपल्याला नकळत साथ देते. विरह, एकांत, सौंदर्य, दु:ख आणि गूढता यांचे सूक्ष्म पदर उलगडतात.

मराठी गझलविश्वात अनेक प्रतिभावान गझलकार आहेत. पण ज्यांनी माझ्या मनात खोलवर घर केलं, त्यांपैकी एक महत्त्वपूर्ण नाव म्हणजे श्री गणेश नागवडे सर.

मी त्यांना प्रत्यक्ष भेटलेलो नाही किंवा संपर्क नाही तरीही अनेक वर्षांपासून त्यांचे फेसबुक फ्रेंड म्हणून त्यांचे लिखाण नियमित वाचतो. त्यांचे शेर आणि गझल माझ्या हृदयाला भिडतात. त्यांच्या फेसबुक वॉलला मी अधूनमधून भेट देतो, नवीन पोस्ट पाहतो, आणि त्यांच्या शब्दांशी संवाद साधतो. या संवादातून एक अदृश्य मैत्रीची जुळवण होते.

त्यांच्या गझलांनी मला नेहमी नव्याने भावनिक धरसोड दिली, मनाच्या गाभ्यात उतरली आणि रुजली. त्यांच्या लेखनातून केवळ वाचणे नव्हे तर अनुभवण्याचा अनुभव मिळाला. त्यांचा प्रत्येक शेर वेदनेचा नवा पदर उघडतो. त्यात आयुष्याच्या गूढतेची झलक आणि त्याहूनही अधिक काहीतरी अंतर्मनातील गूढ आहे.

“माझे दु:ख समाधीमध्ये मावू शकले नाही
मी माझ्या ज्ञानाची दुखलेली आळंदी आहे”

या ओळींमध्ये दु:खाचं आध्यात्मिक रूपांतरण पाहायला मिळतं. ‘समाधी’, ‘ज्ञान’, ‘आळंदी’ हे प्रतीक अंतर्मनाच्या प्रवासाची आणि तत्त्वज्ञानाची गुंतागुंत दर्शवतात.

“मी तुकाराम खोल दुखलेला
आत माझ्या सुने सुने देहू”

‘तुकाराम’ हे केवळ संत नाही, तर वेदनेचा आवाज आहे. ‘देहू’ हे ठिकाण नसून शोकावलेली अंतःस्थिती आहे.

श्री गणेश नागवडे यांचे पाच गझलसंग्रह प्रकाशित झाले आहेत, ज्यांनी मराठी गझल साहित्यात समृद्धी आणली आहे. त्यांच्या गझलसंग्रहांची नावे अगदी हळवी, अर्थपूर्ण आणि भावपूर्ण आहेत:

  • “व्याकुळ हरणाच्या गोष्टी”
  • “डोहाचे व्याकुळ संदर्भ”
  • “मनाच्या बैचेन फांदीवर”
  • “काचेची घरे आपण”
  • “दुःखाची दुसरी आवृत्ती”

या शीर्षकांतूनच हळव्या भावना, संवेदनशीलता, आणि मानवी मनाचा वेदना-भरा अनुभव जाणवतो. काही निवडक शेर पाहूयात:

“डोहामधले डोळे पाहत बसलो आहे
मी हरणाचे डोळे पाहत बसलो आहे”

हे डोळे केवळ दृश्य नाहीत; ते खोल भावभावनांचे प्रतिबिंब आहेत.

“बाईमध्ये असणाऱ्या गहिऱ्या डोहाच्या गोष्टी
मी पोरीला सांगितल्या व्याकुळ हरणांच्या गोष्टी”

‘बाई’ केवळ स्त्री नाही, ती अनुभवांची सजीव सृष्टी आहे, तिच्या गाभ्यात भावविश्व आहे, जे पिढ्यान्पिढ्या पोहोचवले जाते.

“तुला जाळीत दिसले दात वाघाचे
मला पाण्यात दिसला पाय हरणाचा”

ही ओळी वास्तवाशी निगडित, जीवंत प्रतीके वापरून प्रचंड संवेदनशीलता उभी करतात.

“शांतपणे हा सगळा प्रकार पाहत बसणे
महिनाअखेर उरला पगार पाहत बसणे”

हा शेर मध्यमवर्गीय माणसाच्या रोजच्या संघर्षाचा आणि विवंचनेचा आरसा आहे.

“भल्या थंडीत गेला जीव भिकाऱ्याचा
किती रडली पहा दर्ग्यावरी चादर”

श्रद्धा आणि वास्तव यांचा विदारक संघर्ष यातून दिसून येतो.

“अचानक थांबला हबकून वाजंत्री
मिठीमध्ये मुलीच्या बाप रडल्यावर”

लग्नाच्या आनंदाच्या क्षणांमध्ये हृदयाला भिडणारा भावनांचा उद्रेक.

“यामुळेच तर तुला विसरणे सोपे गेले
तुझ्याहूनही सुंदर माझी मुलगी होती”

वरवर पाहता बोचरा वाटणारा हा शेर, जीवनातील कटू अनुभवांची खूण आहे.

मी त्यांचे हे पाचही संग्रह संग्रही ठेवले आहेत. अधूनमधून त्यांची गझले पुन्हा वाचतो. या सर्वांतून मला जाणवले की गणेश नागवडे हे संवेदनशील मनाचे कवी आहेत.


गणेश नागवडे हे माझ्यासारख्या असंख्य गझलप्रेमी रसिकांच्या भावविश्वाचे सहप्रवासी आहेत. त्यांचे शेर वाचताना असे वाटते की हे शब्द माझ्या हृदयातीलच आहेत आणि मला स्वतःलाच लिहायला पाहिजेत होते. ते फक्त गझलकार नाहीत, तर भावनांचा शब्दसखा आहेत. म्हणून ते माझ्या आवडत्या गझलकारांच्या यादीत अग्रस्थानावर आहेत.

धन्यवाद!

— सतिश गुलाबसिंह मालवे
९५२७९१२६५
(एक गझलप्रेमी रसिक वाचक)


टीप: हा लेख सुरुवातीला स्नेहगझल समूहाच्या ‘माझा आवडता गझलकार’ उपक्रमासाठी लिहिला गेला होता. आज या लेखाला कायम ठेवण्याच्या उद्देशाने, त्याचा मी माझ्या ब्लॉगवर "गुलाबीगझल" पोस्ट केला आहे. गझलप्रेमी रसिकांनी या लेखाचा मनापासून आस्वाद घ्यावा हीच माझी इच्छा आहे.

एक पक्षी गझल संग्रह मुखपृष्ठ | ek pakshi covar

 एक पक्षी गझल संग्रह मुखपृष्ठ | ek pakshi covar 

एक पक्षी गझल संग्रह मुखपृष्ठ | ek pakshi covar


दिशांतर... डॉ स्नेहल कुलकर्णी यांचा एक गझलप्रवास - सतिश गुलाबसिंह मालवे

दिशांतर…..एक गझलप्रवास


दिशांतर... डॉ स्नेहल कुलकर्णी यांचा एक गझलप्रवास - सतिश गुलाबसिंह मालवे



पाताळ शोधल्यावर तारे मला मिळाले
मी थांबले तरीही झाले कसे दिशांतर

मराठी गझलविश्व आज अनेक प्रतिभासंपन्न, जाणीवसंपन्न आणि संवेदनशील गझलकारांनी समृद्ध होत आहे. या गझलपर्वात काही महिला गझलकारा ज्या ताकदीने आणि जाणिवेने गझलेला आत्म्याचा स्पर्श देतात, त्यात आदरणीय डॉ. स्नेहलताई कुलकर्णी (दिशा) यांचे नाव मोठ्या आदराने घेतल्या जाते.. हे नाव रसिकांच्या मना-मनात कोरले गेले आहे. आणि म्हणूनच आजच्या महिला गझलकारांमध्ये त्यांचे नाव ध्रुवताऱ्याप्रमाणे अढळ झाले आहे.

काही महिन्यांपूर्वीच स्नेहलताईंचा प्रसिद्ध झालेला गझलसंग्रह "दिशांतर" हे त्याचेच भक्कम उदाहरण होय. या संग्रहातील गझलांना केवळ शब्दसौंदर्य नाही, तर एक स्पष्ट आशय, जीवनदृष्टी आणि आत्ममूल्यांची सखोल मांडणी आहे. आदरणीय डॉ. स्नेहलताई (दिशा) वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असूनदेखील त्यांचं मन साहित्यात अत्यंत उत्कट आहे. गझलच्या नियमांच्या चौकटीत राहून स्वतःची स्वतंत्र भाषा, स्वतःचं जीवनदर्शन त्या शब्दबद्ध करतात. त्यांच्या लिखाणात एक सुसंस्कृत वैचारिकता आहे. दिशांतर संग्रह हाती पडल्याबरोबर संग्रहाचं मुखपृष्ठ लक्ष वेधून घेते संकल्पनात्मक सौंदर्य... एका एकाकी, चाललेल्या बाईची आकृती, भोवती रंगांची स्वप्नाळू उधळण, आणि पार्श्वभूमीतील धूसर अंधुकता हे सगळं मिळून ‘दिशांतर’ या संकल्पनेला आशयगर्भ पातळीवर अधोरेखित करणारे हे मुखपृष्ठ चित्रकार संतोष घोंगडे यांनी साकारले आहे.

या संग्रहातील गझला वाचताना प्रथम जाणवतो तो म्हणजे स्नेहलताईंचा शब्दांवरील अलौकिक हक्क. त्या साध्या, सहज भाषेत खोल अर्थ सांगतात. विशेष म्हणजे संग्रहात स्त्रीजाणीवा, नातेसंबंधातील सूक्ष्म भावनिक गुंतागुंत, आत्मसंवाद, वैयक्तिक संघर्ष, आणि आधुनिक जीवनातील विसंगती यांचे चित्रण अत्यंत नजाकतीने आणि ठामपणे केले आहे. अनेक गझलांमध्ये अंतर्मुख स्त्रीच्या अनुभवांचे गहिरे दर्शन होते.

रडू ऐकून बाळाचे म्हणाले माफ कर देवा
पुजा सोडून अर्ध्यावर उठावे लागते आहे

वरील शेर वाचून वाचक निःशब्द होणार नाही तर नवल!

पडणे पडून उठणे आयुष्य हेच जर
जातोय तोल त्याला सावर कसे म्हणू

स्नेहलताईंच्या गझलांचा उल्लेख करताना सर्वप्रथम नमूद करावे लागेल की, त्यांनी गझलेच्या पारंपरिक रचनेशी नाते ठेवत त्यात स्त्रीदृष्टी, अनुभवांची झालर आणि शब्दांच्या संकोचातून विचारांचा विस्तार साधला आहे. त्यांच्या बहुतेक गझलांमध्ये प्रकटतेपेक्षा अधिक सूचकता आढळते.

ठेवून रिकामी ओंजळ मी कसे पाठवू त्याला
तो प्रेम मागण्यासाठी गुडघ्यावर बसला आहे

‘दिशांतर’ ही फक्त भौगोलिक नव्हे तर भावनिक स्थलांतराची प्रक्रिया आहे, हे स्पष्ट दिसते. त्या एकीकडे यमक, लय, गेयता या घटकांशी इमान राखतात, तसंच अर्थगर्भतेला प्राथमिकता देतात.

एवढे माझी चुकीचे शब्द पसरवले कुणी
तीर्थ मी मागितले तर रक्त शिंपडले कुणी

हा शेर भाषेच्या चुकीच्या अर्थांचे परिणाम किती विकृत स्वरूप धारण करू शकतात हे दर्शवतो. पावित्र्याची मागणी करताना हिंसेची प्रतिक्रिया मिळणे हे आजच्या सामाजिक व राजकीय भाषेचं वास्तव स्नेहलताईंनी किती कमी शब्दात मांडले आहे.

एवढ्या हलक्या थराला सूर्य नाही जायचा
कवडसा पाहून माझे तेजही गिळले कुणी

इथे तेजाचा संदर्भ स्वत्वाशी आहे. कवडसाच्या भ्रमात इतरांनी आपलं तेज ओरबाडून नेणं ही फार वेदनादायी जाणीव या शेरातून व्यक्त केल्याचे दिसून येते.

स्नेहलताईंची शब्दावरची जी पकड आहे ती पाहून कधी कधी तर थक्क व्हायला होतं.

बनवली बाहुली त्याने इथे प्रत्येक गोष्टीची
तुझी का मूर्त एखादी मना घडू शकत नाही

प्रेमातील स्वीकार, ओळख आणि स्मृती याबद्दल असलेला हा शेर वस्तूंना मूर्त स्वरूप देता येते, पण मनाच्या कोपऱ्यात घर करून बसलेल्या आठवणींचे स्वरूप नाही देता येत, ही हळूवार जाणीव इथे ताईंनी व्यक्त केलेली दिसते.

मला प्रत्येक गोष्टीची नशा विधिवत हवी होती
धुक्यामध्ये विहरताना उन्हे सोबत हवी होती

हा शेर समांतर जगण्याची, भरकटलेल्या अस्तित्वाची, आणि तरीही प्रकाशाच्या आसक्तीची अनुभूती देऊन जातो.

गडच शृंगार दोघांचा विसरले श्रावणानंतर
पुन्हा भरायची संधी तुझ्यामार्फत हवी होती

इथे प्रेमात ओहोटीचा काळ आणि त्यानंतर नव्याने सुरूवात करण्याची आर्तता अतिशय हळुवारपणे व्यक्त केलेली आपल्याला दिसून येईल.

बानू बानू मारत हाका दारी आला आहे
माझ्यासाठी गड सोडुन मल्हारी आला आहे

हा शेर लोक कथेमधील संदर्भ वापरून व्यक्तिगत भावभावना स्पष्ट करतो. समर्पण, आश्वासकता आणि प्रेमातील धैर्य या भावनांचं दर्शन इथे नक्कीच वाचकाला घडवून आणतो.

इतकी सुंदर कधीच नव्हते दिसली कोणालाही
कुठुन पारखी नजरेचा जोहारी आला आहे

जोहारीच्या दृष्टिकोनातून सुंदरतेचा शोध हा केवळ बाह्यतेपेक्षा अधिक खोल असतो. त्यातून उद्भवणारी स्त्री-प्रसिद्धी या शेरात प्रकट होते.

नको देऊस गुंगारा तिला समजून मनमौजी
तुझ्यामागे दिशा अपुली प्रथा मोडून येते का?

या शेरात स्त्रीच्या निर्णय क्षमतेविषयी आणि पुरुषप्रधान समाजव्यवस्थेतील रूढींच्या विरोधात स्त्री स्वतःचा मार्ग शोधते याची परिचिती वाचकाला झाल्याशिवाय राहत नाही.

सूर्य रात्रीच्या कुशीतुन ओघळावा लागतो
गारव्यापोटी उन्हाला जन्म घ्यावा लागतो

वरील शेर निसर्गचक्राचा दाखला देऊन परिवर्तन, समर्पण, आणि पुनर्जन्म या तात्त्विक संकल्पना अधोरेखित करणारा वाटतो..

पित्त त्याचेही खवळते रोज माझ्यासारखे
शंकराला चंदनाचा लेप द्यावा लागतो

शांततेचे प्रतीक असलेल्या देवतेलाही रोजच्या यातना असतात, त्यालाही शमन लागते ही मानवी भावना या शेरात किती अप्रतिमपणे मांडली आहे.

‘दिशांतर’ हा संग्रह म्हणजे केवळ काव्यप्रवास नव्हे, तर संवेदनांचा, अनुभवांचा आणि आत्मप्रत्ययाचा एक विलक्षण उजवेला वळण घेणारा प्रवास आहे. काळजाच्या कप्प्यात जपून ठेवावा असाच आहे.

स्नेहलताईंचा दिशांतर हा दुसरा संग्रह आहे. यापूर्वी स्नेहांकित हा गझलसंग्रह वैचारिक समृद्धी आणि आशय समृद्धीला घेऊन उतरल्याने प्रचंड गाजला होता. त्याचप्रमाणे दिशांतर गाजला आहे त्याबद्दल स्नेहलताईंचे मन:पूर्वक अभिनंदन.

मी स्वतःला खूप भाग्यशाली मानतो कारण आदरणीय डॉ. स्नेहलताई माझ्या मार्गदर्शक आहेत. त्यांचे स्नेह आणि मार्गदर्शन मला लाभत राहते. त्यामुळे मी स्नेहलताईंच्या संग्रहावर काय लिहिणार? एक रसिक, एक वाचक, एक गझलप्रेमी या नात्याने जे मनाला पटले, आवडले तेच इथे मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.

धन्यवाद!
— सतिश गुलाबसिंह मालवे
(एक गझलप्रेमी | रसिक| वाचक)

अतुल देशपांडे यांचे आत्म्याला भिडणारे शब्द - सतीश गुलाबसिंह मालवे

अतुल देशपांडे यांचे आत्म्याला भिडणारे शब्द - सतीश गुलाबसिंह मालवे

अतुल देशपांडे यांचे आत्म्याला भिडणारे शब्द

"मित्र म्हणून नाही तर रसिक म्हणून ऐक आणि मार्गदर्शन कर"
असे जेव्हा अतुल सर मला म्हणतात तेव्हा मी निशब्द होऊन जातो... कारण वरील शब्द केवळ विनम्रतेचा आविष्कार नाहीत, तर गझलेला आत्म्यापासून भिडलेला एक विनयशील शायर बोलतो आहे याची साक्ष आहे. गझल म्हणजे नुसती शब्दांची मांडणी नसते...ती एक शिस्तबद्ध आत्मअनुभूती आहे...हे ज्यांच्या वर्तनातून आणि लेखनातून ठळकपणे आपल्याला जाणवतं ते म्हणजे अतिशय उतुंग व्यक्तिमत्त्व श्री. अतुल देशपांडे सर आहेत हे मी ते माझे चांगले मित्र आहेत म्हणून बोलत नाही तर आजवर मी त्यांच्या गझल आणि त्यांच्या एकूणच सहवासात मला आलेला अनुभवावरून बोललो...

अतुल सरांच्या गझलांमध्ये त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा उमटतो सजग, सौम्य आणि प्रामाणिकता त्यांच्या गझलेत उतरताना दिसतो...नाटकीपणा न करता गझलेतला खरेपणा साक्षात आपल्याला त्यांचा शेरात दिसून येतो.

गुणांची खाण आहे मी तरीही
मला शेखी मिरवता येत नाही

हा शेर म्हणजे नम्रतेच्या सौंदर्याची साक्ष आहे. ही केवळ आत्मपरीक्षणाची नोंद नाही, तर आत्मिक प्रगल्भतेचा आविष्कार आहे. गुण असणं ही एक गोष्ट आहे, पण ते न दाखवता राहणं ही खरी ‘शेखी’ असते.

जीवनाची कठोर आणि खरी जाणीव जर अनुभवावी असेल तर ती अतुल देशपांडे सर यांच्या गझलातून आपल्याला अनुभवता येते... मृत्यूला पूर्वसूचना नसते. म्हणूनच जीवन क्षणभंगुर आहे, ते एका शेरात म्हणतात:

जे करायचे जेव्हा, ते करून घे तेव्हा
काळ वेळ मृत्यूची घोषणा कुठे करतो.

विचार केला तर गझल ही केवळ कलाकृती नाही, ती एक आत्मज्वाला आहे. आपले म्हणणे नेमकेपणाने सांगण्याचं एक कौशल्य असते. कवितेतील ताकद ही शब्दांत नसते, ती अनुभवात असते, हा शेर त्याचेच एक द्योतक म्हटलं तर अतिशयोक्ती ठरू नये:

व्हायला सुंदर गझल नस सापडावी लागते
आतमध्ये एक ठिणगी जाळ व्हावी लागते

गझल वाचायला आणि समजायला जितकी सोपी वाटते, तितकी ती लिहायला सोपी नसतेच, कारण एका जमून आलेल्या शेरामागे गझलकाराची मेहनत असते. त्याने त्या दोन ओळींसाठी अवघी प्रतिभा पणाला लावलेली असते.

आईच्या कष्टांची आणि दारिद्र्याच्या असहायतेची अंतर्मुख करणारी नोंद म्हणजे वरील शेर! माय भुकेला थोपवण्याचा प्रयत्न करते, पण भूक जेव्हा प्राणघातक बनते, तेव्हा तिची सारी तगमग हतबल ठरते हे किती नेमकेपणाने वरील शेरामध्ये व्यक्त केल्या गेले आहे:

सांडलेले पीठ गिरणीतून गोळा माय करते
पण भुकेने लेकराचा जीव होता घेतला

अजून याच अंगाने आलेला एक शेर:

चार दाणे ठेवते खिडकीत आई पाखरांना
साठ पोते धान्य पिकते बाप माझा बोललेला

इथे घर म्हणजे फक्त चार भिंती नाहीत.. तर त्या भिंतींत मायेची ऊब आणि श्रमाचं सोनं मिसळलेलं असतं. हा शेर त्या कुटुंबाच्या मूळमूल्यांची जाणीव करून देतो.

मध्यरात्री फोन येतो, वाढते धडधड तशी
पाल चुकचुकते तशातच आणि भरते कापरे

थरकाप उडवणारा अनुभव काळजी, भय आणि अशांततेचा त्रिवेणी संगम या शेरात चांगला उतरून आलेला आहे. केवळ दृश्यात्मकतेसाठी नाही तर जाणीवा हलवण्यासाठी हा शेर जन्माला आला आहे. असे वाचता क्षणी वाटून जाते.

काढले चित्रात मी अश्रू तिचे
खोडरबराने कसे खोडायचे

कला आणि भावना यांचा परस्परसंबंध सांगणारा हा शेर म्हणजे आठवणीचे प्रसंग अधोरेखित करणारा एक अविस्मरणीय क्षण आहे. भावना जर वास्तवात उतरल्या, तर त्या मिटवल्या जात नाहीत. हे यातून अतुल सरांनी स्पष्ट केल्याचे जाणवते.

भिंत सामायिक होती आमच्या दोघांमधे
दोन डोळ्यांच्या प्रमाणे भेटलो नाही कधी

हे शेर केवळ वास्तुरूपक नसून माणसांतील भावनांचे प्रतीक आहे. इतकी जवळ असूनही एकमेकांशी न जुळणं हे आजच्या नात्यांचं मूळ दुःख या शेरात दिसून येत.

केवढी पक्ष्यांत चर्चा झाड सुकल्यावर
कोण उरते सांग हिरवेगार कायमचे?

हा शेर निसर्गदृष्टीतून समाजदृष्टीकडे नेतो. आधार गमावल्यावरच त्याचं महत्त्व कळते.. हा सार्वत्रिक आणि कालातीत संदेश किती कमी शब्दात दिला आहे.

अतुल देशपांडे सर हे फक्त गझलकार नाहीत, ते एक अनुभव सांगणारे संयमी शिल्पकार आहेत. त्यांच्या गझलेत केवळ शेर नसतात, तर एका खोल विचारविश्वाचा आविष्कार असतो. त्यांच्या या विनयशीलतेतून आणि आत्मनिष्ठतेतून गझल एक नवा अर्थ घेऊन आपल्यासमोर येते.

हे लेखन म्हणजे केवळ शेरांचे अर्थ लावण्याचा प्रयत्न नव्हता तर त्या एका दडलेल्या संवेदनशील व्यक्तीची ओळख करून देण्याचा प्रयत्न होत.. त्यांच्या लेखणीतून गझल ही सौंदर्य, सच्चाई आणि साधेपणाचा सुरेल संगम कसा असतो, हे शिकण्यासारखं आहे. म्हणून हा लेखन प्रपंच मांडला आहे.

धन्यवाद!!
– सतीश गुलाबसिंह मालवे