सतीश मालवे यांच्या एक पक्षी गझल संग्रहाला सलग तिसरा राज्यस्तरीय पुरस्कार

“एक पक्षी”ची पुरस्कार हॅट्ट्रिक; सतीश मालवे यांना आणखी एक राज्यस्तरीय मान

“एक पक्षी”ची पुरस्कार हॅट्ट्रिक; सतीश मालवे यांना आणखी एक राज्यस्तरीय मान

डोंबिवली : मराठी गझल क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय ठसा उमटवणारे गझलकार सतीश गुलाबसिंह मालवे यांच्या “एक पक्षी” या गझलसंग्रहाला सलग तिसरा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे. डोंबिवली येथील काव्यरसिक मंडळ तर्फे प्रदान करण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय कै. अनिल साठे स्मृती सर्वोत्कृष्ट गझलसंग्रह पुरस्कार २०२६ अंतर्गत विशेष “कै. अनिल साठे उल्लेखनीय गझलसंग्रह पुरस्कार” या संग्रहाला जाहीर करण्यात आला आहे.

हा पुरस्कार येत्या १ मार्च २०२६ रोजी डोंबिवली येथे आयोजित राज्यस्तरीय हीरक महोत्सवात मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. याबाबतची अधिकृत माहिती मंडळाचे कार्यवाहक व सुप्रसिद्ध गझलकार हेमंत राजाराम यांनी दिली.

विशेष म्हणजे, “एक पक्षी” या गझलसंग्रहाला अल्पावधीत मिळालेला हा तिसरा राज्यस्तरीय सन्मान आहे. यापूर्वी साहित्यकणा फाऊंडेशन, नाशिक तर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय स्व. मधुकर तांबोळी स्मृती सर्वोत्कृष्ट गझलसंग्रह पुरस्कार या संग्रहाला प्राप्त झाला होता. तसेच समरसता साहित्य परिषद महाराष्ट्र राज्य तर्फे २०२५ सालचा सर्वोत्कृष्ट गझलसंग्रह पुरस्कारही या संग्रहाला मिळाला आहे.

प्रकाशनानंतर वर्षपूर्तीही न झालेल्या या संग्रहाने सलग तीन राज्यस्तरीय पुरस्कार पटकावत मराठी गझल क्षेत्रात स्वतंत्र आणि भक्कम ओळख निर्माण केली आहे. आशयघनता, भावस्पर्शी अभिव्यक्ती, सामाजिक भान आणि संवेदनशील मांडणी ही या संग्रहाची वैशिष्ट्ये मानली जात असून रसिक व समीक्षकांकडून त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.

या यशाबद्दल बोलताना कवी सतीश मालवे यांनी आपल्या आई-वडिलांप्रती, गुरूजनांप्रती, वाचकवर्ग व समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त करत हा सन्मान त्यांना समर्पित केला असल्याचे सांगितले. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल साहित्यविश्वातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

नदीची धार दिसल्यावर करू शकतो_marathi gazhal by satish Malve

  नदीची धार दिसल्यावर करू शकतो_marathi gazhal by satish Malve 

Marathi gazhal by satish Malve





नदीची धार दिसल्यावर करू शकतो
तिचाही मी महासागर  करू शकतो

स्वतःला मानल्यावरती सिकंदर मी
हुकूमत पूर्ण विश्वावर करू शकतो

मला दिंडीत जाणे शक्य नाही.. पण
भजन कीर्तन विठोबावर करू शकतो

निराशेच्या ढगांनी व्यापल्यानंतर
व्यथांचे वेगळे अंबर करू शकतो

करू शकतो करू शकतो करू शकतो
मनामध्ये तुझ्या मी घर करू शकतो

तुला विश्वास नाही राहिला माझा
भरोसा कोण माझ्यावर करू शकतो

– सतीश गुलाबसिंह मालवे

Ek Pakshi Marathi gazal sangrah – Satish Malve एक पक्षी मराठी गझलसंग्रह – सतिश मालवे

Ek Pakshi Marathi gazal sangrah – Satish Malve एक पक्षी मराठी गझलसंग्रह – सतिश मालवे 

🌿 "एक पक्षी" – पहिली आवृत्ती संपल्याचा आनंदक्षण 🌿

आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आणि प्रेमामुळे माझा पहिला मराठी गझलसंग्रह "एक पक्षी" याची पहिली आवृत्ती संपली आहे.

माझ्यासारख्या छोट्या गझलकाराला एवढं अपरंपार प्रेम मिळेल, याची मी स्वप्नातसुद्धा कल्पना केली नव्हती.

हे यश तुमचं आहे — कारण प्रत्येक वाचक, प्रत्येक गझलप्रेमी आणि शुभचिंतकानेच या पक्ष्याला उंच भरारी दिली आहे.

🌿 एक पक्षी – गझल संग्रह 🌿

एक पक्षी पुस्तक मुखपृष्ठ सतिश गुलाबसिंह मालवे

📖 पुस्तकाची माहिती

  • लेखक: सतिश गुलाबसिंह मालवे
  • मुखपृष्ठ: संतोष घोंगडे
  • प्रकाशक: गझल मंथन प्रकाशन, कोरपना
  • किंमत: ₹200/-
  • संपर्क: 9527912625
  • पुरस्कार: 🏆संग्रहाला मिळालेला पहिला पुरस्कार समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य तर्फे[समरसता साहित्य पुरस्कार २०२५]

🕊 संग्रहाच्या शीर्षक गझलेतील दोन शेर

गावाकडून आला शहरात एक पक्षी
पडला अजून तेव्हा पेचात एक पक्षी
घेण्यास तो भरारी बाहेर येत असतो 
पाळून ठेवला मी हृदयात एक पक्षी 

📜 या संग्रहातील मान्यवरांच्या मनोगतातून

१. डॉ. शिवाजी काळे (राशीन, कर्जत )
सतीशजींची गझल मातीची माया, घामाचा सुगंध, आणि निरागस मनाची सच्चाई घेऊन येते...

२. श्री.निलेश कवडे (अकोला)
सुचलेले मांडण्याऐवजी सोसलेले मांडण्याच्या भूमिकेमुळे सतीश मालवे यांची गझल आपसूकच वैशिष्ट्यपूर्ण ठरते...

३. श्री. अनंत ढवळे (अमेरिका)
गझलेचा शेर सांगण्याचं / लिहिण्याचं काही एक कौशल्य आहे - त्यात विषयाची मांडणी, शब्दाची निवड ह्या खेरीज इतरही अनेक गोष्टी आहेत. शेर क्वचित प्रतिमानांमधून बोलतो तर कधी थेट बखानातून. सतिश मालवे ह्यांना शेरांची ही कला साधली आहे असे म्हणता येते. 

४. डॉ. स्नेहल कुलकर्णी
लिखाणातून सामाजिक प्रश्नांचा, दुःखांचा केवळ उदो उदो न करता, चिंतनशील पातळीवर जाऊन अपार मानवी करुणेने त्यांचा वेध घेण्याची धडपड सतीशजींच्या लेखणीतून उजागर होताना दिसते


🙏 मनःपूर्वक आभार तुमच्यापुढे 🙏

माझा आवडता गझलकार : गणेश नागवडे सर | maza aavdta gazalkar

माझा आवडता गझलकार : आ. श्री. गणेश नागवडे

✒️ रसिक – सतिश गुलाबसिंह मालवे


स्नेहगझल समूहामध्ये सुरू असलेल्या ‘माझा आवडता गझलकार’ या सुंदर उपक्रमासाठी संयोजिका अंजलीताई दीक्षित यांचे मन:पूर्वक आभार! त्यांनी या उपक्रमाला उत्तम प्रकारे हातभार लावला आणि माझ्यासारख्या अंतर्मुख रसिकालाही व्यक्त व्हायला प्रेरणा दिली. समूहात येणाऱ्या दर्जेदार पोस्ट पाहून मला देखील वाटले की मला या उपक्रमात सहभागी व्हावे, काहीतरी लिहावे.

मी एक वाचक, एक गझलप्रेमी म्हणून माझ्या आवडत्या गझलकाराची ओळख त्यांच्या शेरांमधून करून देण्याचा प्रयत्न करतो.

गझल म्हणजे केवळ शब्दांची कसरत नाही; ती हळव्या भावना, नाजूक संवेदना आणि अंतर्मनातील तरल पडसादांनी आकारलेली सर्जनशील अभिव्यक्ती आहे. जीवनाच्या प्रत्येक वळणावर गझल आपल्याला नकळत साथ देते. विरह, एकांत, सौंदर्य, दु:ख आणि गूढता यांचे सूक्ष्म पदर उलगडतात.

मराठी गझलविश्वात अनेक प्रतिभावान गझलकार आहेत. पण ज्यांनी माझ्या मनात खोलवर घर केलं, त्यांपैकी एक महत्त्वपूर्ण नाव म्हणजे श्री गणेश नागवडे सर.

मी त्यांना प्रत्यक्ष भेटलेलो नाही किंवा संपर्क नाही तरीही अनेक वर्षांपासून त्यांचे फेसबुक फ्रेंड म्हणून त्यांचे लिखाण नियमित वाचतो. त्यांचे शेर आणि गझल माझ्या हृदयाला भिडतात. त्यांच्या फेसबुक वॉलला मी अधूनमधून भेट देतो, नवीन पोस्ट पाहतो, आणि त्यांच्या शब्दांशी संवाद साधतो. या संवादातून एक अदृश्य मैत्रीची जुळवण होते.

त्यांच्या गझलांनी मला नेहमी नव्याने भावनिक धरसोड दिली, मनाच्या गाभ्यात उतरली आणि रुजली. त्यांच्या लेखनातून केवळ वाचणे नव्हे तर अनुभवण्याचा अनुभव मिळाला. त्यांचा प्रत्येक शेर वेदनेचा नवा पदर उघडतो. त्यात आयुष्याच्या गूढतेची झलक आणि त्याहूनही अधिक काहीतरी अंतर्मनातील गूढ आहे.

“माझे दु:ख समाधीमध्ये मावू शकले नाही
मी माझ्या ज्ञानाची दुखलेली आळंदी आहे”

या ओळींमध्ये दु:खाचं आध्यात्मिक रूपांतरण पाहायला मिळतं. ‘समाधी’, ‘ज्ञान’, ‘आळंदी’ हे प्रतीक अंतर्मनाच्या प्रवासाची आणि तत्त्वज्ञानाची गुंतागुंत दर्शवतात.

“मी तुकाराम खोल दुखलेला
आत माझ्या सुने सुने देहू”

‘तुकाराम’ हे केवळ संत नाही, तर वेदनेचा आवाज आहे. ‘देहू’ हे ठिकाण नसून शोकावलेली अंतःस्थिती आहे.

श्री गणेश नागवडे यांचे पाच गझलसंग्रह प्रकाशित झाले आहेत, ज्यांनी मराठी गझल साहित्यात समृद्धी आणली आहे. त्यांच्या गझलसंग्रहांची नावे अगदी हळवी, अर्थपूर्ण आणि भावपूर्ण आहेत:

  • “व्याकुळ हरणाच्या गोष्टी”
  • “डोहाचे व्याकुळ संदर्भ”
  • “मनाच्या बैचेन फांदीवर”
  • “काचेची घरे आपण”
  • “दुःखाची दुसरी आवृत्ती”

या शीर्षकांतूनच हळव्या भावना, संवेदनशीलता, आणि मानवी मनाचा वेदना-भरा अनुभव जाणवतो. काही निवडक शेर पाहूयात:

“डोहामधले डोळे पाहत बसलो आहे
मी हरणाचे डोळे पाहत बसलो आहे”

हे डोळे केवळ दृश्य नाहीत; ते खोल भावभावनांचे प्रतिबिंब आहेत.

“बाईमध्ये असणाऱ्या गहिऱ्या डोहाच्या गोष्टी
मी पोरीला सांगितल्या व्याकुळ हरणांच्या गोष्टी”

‘बाई’ केवळ स्त्री नाही, ती अनुभवांची सजीव सृष्टी आहे, तिच्या गाभ्यात भावविश्व आहे, जे पिढ्यान्पिढ्या पोहोचवले जाते.

“तुला जाळीत दिसले दात वाघाचे
मला पाण्यात दिसला पाय हरणाचा”

ही ओळी वास्तवाशी निगडित, जीवंत प्रतीके वापरून प्रचंड संवेदनशीलता उभी करतात.

“शांतपणे हा सगळा प्रकार पाहत बसणे
महिनाअखेर उरला पगार पाहत बसणे”

हा शेर मध्यमवर्गीय माणसाच्या रोजच्या संघर्षाचा आणि विवंचनेचा आरसा आहे.

“भल्या थंडीत गेला जीव भिकाऱ्याचा
किती रडली पहा दर्ग्यावरी चादर”

श्रद्धा आणि वास्तव यांचा विदारक संघर्ष यातून दिसून येतो.

“अचानक थांबला हबकून वाजंत्री
मिठीमध्ये मुलीच्या बाप रडल्यावर”

लग्नाच्या आनंदाच्या क्षणांमध्ये हृदयाला भिडणारा भावनांचा उद्रेक.

“यामुळेच तर तुला विसरणे सोपे गेले
तुझ्याहूनही सुंदर माझी मुलगी होती”

वरवर पाहता बोचरा वाटणारा हा शेर, जीवनातील कटू अनुभवांची खूण आहे.

मी त्यांचे हे पाचही संग्रह संग्रही ठेवले आहेत. अधूनमधून त्यांची गझले पुन्हा वाचतो. या सर्वांतून मला जाणवले की गणेश नागवडे हे संवेदनशील मनाचे कवी आहेत.


गणेश नागवडे हे माझ्यासारख्या असंख्य गझलप्रेमी रसिकांच्या भावविश्वाचे सहप्रवासी आहेत. त्यांचे शेर वाचताना असे वाटते की हे शब्द माझ्या हृदयातीलच आहेत आणि मला स्वतःलाच लिहायला पाहिजेत होते. ते फक्त गझलकार नाहीत, तर भावनांचा शब्दसखा आहेत. म्हणून ते माझ्या आवडत्या गझलकारांच्या यादीत अग्रस्थानावर आहेत.

धन्यवाद!

— सतिश गुलाबसिंह मालवे
९५२७९१२६५
(एक गझलप्रेमी रसिक वाचक)


टीप: हा लेख सुरुवातीला स्नेहगझल समूहाच्या ‘माझा आवडता गझलकार’ उपक्रमासाठी लिहिला गेला होता. आज या लेखाला कायम ठेवण्याच्या उद्देशाने, त्याचा मी माझ्या ब्लॉगवर "गुलाबीगझल" पोस्ट केला आहे. गझलप्रेमी रसिकांनी या लेखाचा मनापासून आस्वाद घ्यावा हीच माझी इच्छा आहे.

एक पक्षी गझल संग्रह मुखपृष्ठ | ek pakshi covar

 एक पक्षी गझल संग्रह मुखपृष्ठ | ek pakshi covar 

एक पक्षी गझल संग्रह मुखपृष्ठ | ek pakshi covar


दिशांतर... डॉ स्नेहल कुलकर्णी यांचा एक गझलप्रवास - सतिश गुलाबसिंह मालवे

दिशांतर…..एक गझलप्रवास


दिशांतर... डॉ स्नेहल कुलकर्णी यांचा एक गझलप्रवास - सतिश गुलाबसिंह मालवे



पाताळ शोधल्यावर तारे मला मिळाले
मी थांबले तरीही झाले कसे दिशांतर

मराठी गझलविश्व आज अनेक प्रतिभासंपन्न, जाणीवसंपन्न आणि संवेदनशील गझलकारांनी समृद्ध होत आहे. या गझलपर्वात काही महिला गझलकारा ज्या ताकदीने आणि जाणिवेने गझलेला आत्म्याचा स्पर्श देतात, त्यात आदरणीय डॉ. स्नेहलताई कुलकर्णी (दिशा) यांचे नाव मोठ्या आदराने घेतल्या जाते.. हे नाव रसिकांच्या मना-मनात कोरले गेले आहे. आणि म्हणूनच आजच्या महिला गझलकारांमध्ये त्यांचे नाव ध्रुवताऱ्याप्रमाणे अढळ झाले आहे.

काही महिन्यांपूर्वीच स्नेहलताईंचा प्रसिद्ध झालेला गझलसंग्रह "दिशांतर" हे त्याचेच भक्कम उदाहरण होय. या संग्रहातील गझलांना केवळ शब्दसौंदर्य नाही, तर एक स्पष्ट आशय, जीवनदृष्टी आणि आत्ममूल्यांची सखोल मांडणी आहे. आदरणीय डॉ. स्नेहलताई (दिशा) वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असूनदेखील त्यांचं मन साहित्यात अत्यंत उत्कट आहे. गझलच्या नियमांच्या चौकटीत राहून स्वतःची स्वतंत्र भाषा, स्वतःचं जीवनदर्शन त्या शब्दबद्ध करतात. त्यांच्या लिखाणात एक सुसंस्कृत वैचारिकता आहे. दिशांतर संग्रह हाती पडल्याबरोबर संग्रहाचं मुखपृष्ठ लक्ष वेधून घेते संकल्पनात्मक सौंदर्य... एका एकाकी, चाललेल्या बाईची आकृती, भोवती रंगांची स्वप्नाळू उधळण, आणि पार्श्वभूमीतील धूसर अंधुकता हे सगळं मिळून ‘दिशांतर’ या संकल्पनेला आशयगर्भ पातळीवर अधोरेखित करणारे हे मुखपृष्ठ चित्रकार संतोष घोंगडे यांनी साकारले आहे.

या संग्रहातील गझला वाचताना प्रथम जाणवतो तो म्हणजे स्नेहलताईंचा शब्दांवरील अलौकिक हक्क. त्या साध्या, सहज भाषेत खोल अर्थ सांगतात. विशेष म्हणजे संग्रहात स्त्रीजाणीवा, नातेसंबंधातील सूक्ष्म भावनिक गुंतागुंत, आत्मसंवाद, वैयक्तिक संघर्ष, आणि आधुनिक जीवनातील विसंगती यांचे चित्रण अत्यंत नजाकतीने आणि ठामपणे केले आहे. अनेक गझलांमध्ये अंतर्मुख स्त्रीच्या अनुभवांचे गहिरे दर्शन होते.

रडू ऐकून बाळाचे म्हणाले माफ कर देवा
पुजा सोडून अर्ध्यावर उठावे लागते आहे

वरील शेर वाचून वाचक निःशब्द होणार नाही तर नवल!

पडणे पडून उठणे आयुष्य हेच जर
जातोय तोल त्याला सावर कसे म्हणू

स्नेहलताईंच्या गझलांचा उल्लेख करताना सर्वप्रथम नमूद करावे लागेल की, त्यांनी गझलेच्या पारंपरिक रचनेशी नाते ठेवत त्यात स्त्रीदृष्टी, अनुभवांची झालर आणि शब्दांच्या संकोचातून विचारांचा विस्तार साधला आहे. त्यांच्या बहुतेक गझलांमध्ये प्रकटतेपेक्षा अधिक सूचकता आढळते.

ठेवून रिकामी ओंजळ मी कसे पाठवू त्याला
तो प्रेम मागण्यासाठी गुडघ्यावर बसला आहे

‘दिशांतर’ ही फक्त भौगोलिक नव्हे तर भावनिक स्थलांतराची प्रक्रिया आहे, हे स्पष्ट दिसते. त्या एकीकडे यमक, लय, गेयता या घटकांशी इमान राखतात, तसंच अर्थगर्भतेला प्राथमिकता देतात.

एवढे माझी चुकीचे शब्द पसरवले कुणी
तीर्थ मी मागितले तर रक्त शिंपडले कुणी

हा शेर भाषेच्या चुकीच्या अर्थांचे परिणाम किती विकृत स्वरूप धारण करू शकतात हे दर्शवतो. पावित्र्याची मागणी करताना हिंसेची प्रतिक्रिया मिळणे हे आजच्या सामाजिक व राजकीय भाषेचं वास्तव स्नेहलताईंनी किती कमी शब्दात मांडले आहे.

एवढ्या हलक्या थराला सूर्य नाही जायचा
कवडसा पाहून माझे तेजही गिळले कुणी

इथे तेजाचा संदर्भ स्वत्वाशी आहे. कवडसाच्या भ्रमात इतरांनी आपलं तेज ओरबाडून नेणं ही फार वेदनादायी जाणीव या शेरातून व्यक्त केल्याचे दिसून येते.

स्नेहलताईंची शब्दावरची जी पकड आहे ती पाहून कधी कधी तर थक्क व्हायला होतं.

बनवली बाहुली त्याने इथे प्रत्येक गोष्टीची
तुझी का मूर्त एखादी मना घडू शकत नाही

प्रेमातील स्वीकार, ओळख आणि स्मृती याबद्दल असलेला हा शेर वस्तूंना मूर्त स्वरूप देता येते, पण मनाच्या कोपऱ्यात घर करून बसलेल्या आठवणींचे स्वरूप नाही देता येत, ही हळूवार जाणीव इथे ताईंनी व्यक्त केलेली दिसते.

मला प्रत्येक गोष्टीची नशा विधिवत हवी होती
धुक्यामध्ये विहरताना उन्हे सोबत हवी होती

हा शेर समांतर जगण्याची, भरकटलेल्या अस्तित्वाची, आणि तरीही प्रकाशाच्या आसक्तीची अनुभूती देऊन जातो.

गडच शृंगार दोघांचा विसरले श्रावणानंतर
पुन्हा भरायची संधी तुझ्यामार्फत हवी होती

इथे प्रेमात ओहोटीचा काळ आणि त्यानंतर नव्याने सुरूवात करण्याची आर्तता अतिशय हळुवारपणे व्यक्त केलेली आपल्याला दिसून येईल.

बानू बानू मारत हाका दारी आला आहे
माझ्यासाठी गड सोडुन मल्हारी आला आहे

हा शेर लोक कथेमधील संदर्भ वापरून व्यक्तिगत भावभावना स्पष्ट करतो. समर्पण, आश्वासकता आणि प्रेमातील धैर्य या भावनांचं दर्शन इथे नक्कीच वाचकाला घडवून आणतो.

इतकी सुंदर कधीच नव्हते दिसली कोणालाही
कुठुन पारखी नजरेचा जोहारी आला आहे

जोहारीच्या दृष्टिकोनातून सुंदरतेचा शोध हा केवळ बाह्यतेपेक्षा अधिक खोल असतो. त्यातून उद्भवणारी स्त्री-प्रसिद्धी या शेरात प्रकट होते.

नको देऊस गुंगारा तिला समजून मनमौजी
तुझ्यामागे दिशा अपुली प्रथा मोडून येते का?

या शेरात स्त्रीच्या निर्णय क्षमतेविषयी आणि पुरुषप्रधान समाजव्यवस्थेतील रूढींच्या विरोधात स्त्री स्वतःचा मार्ग शोधते याची परिचिती वाचकाला झाल्याशिवाय राहत नाही.

सूर्य रात्रीच्या कुशीतुन ओघळावा लागतो
गारव्यापोटी उन्हाला जन्म घ्यावा लागतो

वरील शेर निसर्गचक्राचा दाखला देऊन परिवर्तन, समर्पण, आणि पुनर्जन्म या तात्त्विक संकल्पना अधोरेखित करणारा वाटतो..

पित्त त्याचेही खवळते रोज माझ्यासारखे
शंकराला चंदनाचा लेप द्यावा लागतो

शांततेचे प्रतीक असलेल्या देवतेलाही रोजच्या यातना असतात, त्यालाही शमन लागते ही मानवी भावना या शेरात किती अप्रतिमपणे मांडली आहे.

‘दिशांतर’ हा संग्रह म्हणजे केवळ काव्यप्रवास नव्हे, तर संवेदनांचा, अनुभवांचा आणि आत्मप्रत्ययाचा एक विलक्षण उजवेला वळण घेणारा प्रवास आहे. काळजाच्या कप्प्यात जपून ठेवावा असाच आहे.

स्नेहलताईंचा दिशांतर हा दुसरा संग्रह आहे. यापूर्वी स्नेहांकित हा गझलसंग्रह वैचारिक समृद्धी आणि आशय समृद्धीला घेऊन उतरल्याने प्रचंड गाजला होता. त्याचप्रमाणे दिशांतर गाजला आहे त्याबद्दल स्नेहलताईंचे मन:पूर्वक अभिनंदन.

मी स्वतःला खूप भाग्यशाली मानतो कारण आदरणीय डॉ. स्नेहलताई माझ्या मार्गदर्शक आहेत. त्यांचे स्नेह आणि मार्गदर्शन मला लाभत राहते. त्यामुळे मी स्नेहलताईंच्या संग्रहावर काय लिहिणार? एक रसिक, एक वाचक, एक गझलप्रेमी या नात्याने जे मनाला पटले, आवडले तेच इथे मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.

धन्यवाद!
— सतिश गुलाबसिंह मालवे
(एक गझलप्रेमी | रसिक| वाचक)

अतुल देशपांडे यांचे आत्म्याला भिडणारे शब्द - सतीश गुलाबसिंह मालवे

अतुल देशपांडे यांचे आत्म्याला भिडणारे शब्द - सतीश गुलाबसिंह मालवे

अतुल देशपांडे यांचे आत्म्याला भिडणारे शब्द

"मित्र म्हणून नाही तर रसिक म्हणून ऐक आणि मार्गदर्शन कर"
असे जेव्हा अतुल सर मला म्हणतात तेव्हा मी निशब्द होऊन जातो... कारण वरील शब्द केवळ विनम्रतेचा आविष्कार नाहीत, तर गझलेला आत्म्यापासून भिडलेला एक विनयशील शायर बोलतो आहे याची साक्ष आहे. गझल म्हणजे नुसती शब्दांची मांडणी नसते...ती एक शिस्तबद्ध आत्मअनुभूती आहे...हे ज्यांच्या वर्तनातून आणि लेखनातून ठळकपणे आपल्याला जाणवतं ते म्हणजे अतिशय उतुंग व्यक्तिमत्त्व श्री. अतुल देशपांडे सर आहेत हे मी ते माझे चांगले मित्र आहेत म्हणून बोलत नाही तर आजवर मी त्यांच्या गझल आणि त्यांच्या एकूणच सहवासात मला आलेला अनुभवावरून बोललो...

अतुल सरांच्या गझलांमध्ये त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा उमटतो सजग, सौम्य आणि प्रामाणिकता त्यांच्या गझलेत उतरताना दिसतो...नाटकीपणा न करता गझलेतला खरेपणा साक्षात आपल्याला त्यांचा शेरात दिसून येतो.

गुणांची खाण आहे मी तरीही
मला शेखी मिरवता येत नाही

हा शेर म्हणजे नम्रतेच्या सौंदर्याची साक्ष आहे. ही केवळ आत्मपरीक्षणाची नोंद नाही, तर आत्मिक प्रगल्भतेचा आविष्कार आहे. गुण असणं ही एक गोष्ट आहे, पण ते न दाखवता राहणं ही खरी ‘शेखी’ असते.

जीवनाची कठोर आणि खरी जाणीव जर अनुभवावी असेल तर ती अतुल देशपांडे सर यांच्या गझलातून आपल्याला अनुभवता येते... मृत्यूला पूर्वसूचना नसते. म्हणूनच जीवन क्षणभंगुर आहे, ते एका शेरात म्हणतात:

जे करायचे जेव्हा, ते करून घे तेव्हा
काळ वेळ मृत्यूची घोषणा कुठे करतो.

विचार केला तर गझल ही केवळ कलाकृती नाही, ती एक आत्मज्वाला आहे. आपले म्हणणे नेमकेपणाने सांगण्याचं एक कौशल्य असते. कवितेतील ताकद ही शब्दांत नसते, ती अनुभवात असते, हा शेर त्याचेच एक द्योतक म्हटलं तर अतिशयोक्ती ठरू नये:

व्हायला सुंदर गझल नस सापडावी लागते
आतमध्ये एक ठिणगी जाळ व्हावी लागते

गझल वाचायला आणि समजायला जितकी सोपी वाटते, तितकी ती लिहायला सोपी नसतेच, कारण एका जमून आलेल्या शेरामागे गझलकाराची मेहनत असते. त्याने त्या दोन ओळींसाठी अवघी प्रतिभा पणाला लावलेली असते.

आईच्या कष्टांची आणि दारिद्र्याच्या असहायतेची अंतर्मुख करणारी नोंद म्हणजे वरील शेर! माय भुकेला थोपवण्याचा प्रयत्न करते, पण भूक जेव्हा प्राणघातक बनते, तेव्हा तिची सारी तगमग हतबल ठरते हे किती नेमकेपणाने वरील शेरामध्ये व्यक्त केल्या गेले आहे:

सांडलेले पीठ गिरणीतून गोळा माय करते
पण भुकेने लेकराचा जीव होता घेतला

अजून याच अंगाने आलेला एक शेर:

चार दाणे ठेवते खिडकीत आई पाखरांना
साठ पोते धान्य पिकते बाप माझा बोललेला

इथे घर म्हणजे फक्त चार भिंती नाहीत.. तर त्या भिंतींत मायेची ऊब आणि श्रमाचं सोनं मिसळलेलं असतं. हा शेर त्या कुटुंबाच्या मूळमूल्यांची जाणीव करून देतो.

मध्यरात्री फोन येतो, वाढते धडधड तशी
पाल चुकचुकते तशातच आणि भरते कापरे

थरकाप उडवणारा अनुभव काळजी, भय आणि अशांततेचा त्रिवेणी संगम या शेरात चांगला उतरून आलेला आहे. केवळ दृश्यात्मकतेसाठी नाही तर जाणीवा हलवण्यासाठी हा शेर जन्माला आला आहे. असे वाचता क्षणी वाटून जाते.

काढले चित्रात मी अश्रू तिचे
खोडरबराने कसे खोडायचे

कला आणि भावना यांचा परस्परसंबंध सांगणारा हा शेर म्हणजे आठवणीचे प्रसंग अधोरेखित करणारा एक अविस्मरणीय क्षण आहे. भावना जर वास्तवात उतरल्या, तर त्या मिटवल्या जात नाहीत. हे यातून अतुल सरांनी स्पष्ट केल्याचे जाणवते.

भिंत सामायिक होती आमच्या दोघांमधे
दोन डोळ्यांच्या प्रमाणे भेटलो नाही कधी

हे शेर केवळ वास्तुरूपक नसून माणसांतील भावनांचे प्रतीक आहे. इतकी जवळ असूनही एकमेकांशी न जुळणं हे आजच्या नात्यांचं मूळ दुःख या शेरात दिसून येत.

केवढी पक्ष्यांत चर्चा झाड सुकल्यावर
कोण उरते सांग हिरवेगार कायमचे?

हा शेर निसर्गदृष्टीतून समाजदृष्टीकडे नेतो. आधार गमावल्यावरच त्याचं महत्त्व कळते.. हा सार्वत्रिक आणि कालातीत संदेश किती कमी शब्दात दिला आहे.

अतुल देशपांडे सर हे फक्त गझलकार नाहीत, ते एक अनुभव सांगणारे संयमी शिल्पकार आहेत. त्यांच्या गझलेत केवळ शेर नसतात, तर एका खोल विचारविश्वाचा आविष्कार असतो. त्यांच्या या विनयशीलतेतून आणि आत्मनिष्ठतेतून गझल एक नवा अर्थ घेऊन आपल्यासमोर येते.

हे लेखन म्हणजे केवळ शेरांचे अर्थ लावण्याचा प्रयत्न नव्हता तर त्या एका दडलेल्या संवेदनशील व्यक्तीची ओळख करून देण्याचा प्रयत्न होत.. त्यांच्या लेखणीतून गझल ही सौंदर्य, सच्चाई आणि साधेपणाचा सुरेल संगम कसा असतो, हे शिकण्यासारखं आहे. म्हणून हा लेखन प्रपंच मांडला आहे.

धन्यवाद!!
– सतीश गुलाबसिंह मालवे

एक पक्षी गझल संग्रह| बातमी| लोकमत| सुराज्य| दैनिक

 एक पक्षी गझल संग्रह| बातमी| लोकमत| सुराज्य| दैनिक 

Satish Malve gazal



सतिश मालवे|Satish Malve|साहित्यिक परिचय|एक पक्षी| Ek pakshi

सतिश गुलाबसिंह मालवे

मराठी गझलकार | कवी | लेखक

जन्मतारीख: १९ एप्रिल १९८७

पत्ता

📍 सध्याचा पत्ता:
माऊली अगरबत्ती मार्ट, स्नेहा अपार्टमेंट, मोती चौक, पोस्ट ऑफिस शेजारी,
शिक्रापूर, ता. शिरूर, जि. पुणे – ४१२२०८
📱 ९५२७९१२६२५

📍 कायमचा पत्ता:
मु.पो. मुऱ्हा देवी, ता. अंजनगाव सूर्जी,
जि. अमरावती – ४४४७०५

📧 Email: satishgmalve@gmail.com
🌐 ब्लॉग: GulabiGhazal

व्यवसाय

ऑपरेटर – Oriental Rubber Industries Pvt. Ltd., शिक्रापूर, पुणे

साहित्यिक भूमिका

सहसचिव – गझल मंथन साहित्य संस्था, पुणे विभाग

प्रकाशित साहित्य व साहित्यिक योगदान

  • मराठी गझलसंग्रह – “एक पक्षी” (२७ एप्रिल २०२५ रोजी प्रकाशित)
  • भक्तिगीत संग्रह – “आई माझी पावली नवसाला” (१० गीतांची CD – २०१४)
  • ई-पुस्तिका – “वाघरामी रिवाज” (वाघरी संस्कृतीविषयक – २०१५)
  • गझल, कविता व रसग्रहण लेख – विविध दिवाळी अंक व वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित

सन्मान व पुरस्कार

  • समाजभूषण पुरस्कार – २०१५
  • बंधुता माय मराठी साहित्य पुरस्कार – २०२४
  • समरसता साहित्य पुरस्कार – २०२५ (एक पक्षी संग्रहासाठी)

गझल मुशायरे व साहित्य संमेलनातील सहभाग

  • ९५ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन – उदगीर
  • ८वे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन – रावेरी
  • ५वे राज्यस्तरीय युवा मराठी साहित्य संमेलन – अकोला
  • गझलोत्सव – कल्याण, अक्कलकोट, मूर्तिजापूर, पुणे
  • गझलपुष्प – पिंपरी-चिंचवड
  • ब्रह्मकमळ साहित्य संस्था – मुंबई
  • विद्रोही साहित्य संमेलने – पुणे व अहमदनगर
  • काव्यप्रेमी शिक्षक मंच – पुणे
  • विविध ऑनलाईन व ऑफलाईन मुशायरे

प्रमुख साहित्यिक सहभाग

  • साहित्यदीप प्रतिष्ठान – पुणे
  • अखिल भारतीय साहित्य समूह – मुंबई
  • ९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन – वर्धा
  • अंकुर साहित्य संघ – अकोला
  • अखिल भारतीय एल्गार मराठी गझल संमेलन – अंमळनेर व अंबेजोगाई
  • ११ वे अखिल भारतीय शेतकरी साहित्य संमेलन – मोहाडी, नाशिक

संपर्क

📱 ९५२७९१२६२५
📧 satishgmalve@gmail.com
🌐 Gulabi Ghazal

संदर्भ लिंक

📖 लोकमतमधील बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

📖 सुराज्यमधील बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

एक पक्षी गझल संग्रहाला समरसता साहित्य पुरस्कार बातमी स्वाभिमानी छावा दैनिक ०५/०८/२०२५

एक पक्षी गझल संग्रहाला समरसता साहित्य पुरस्कार बातमी स्वाभिमानी छावा दैनिक ०५/०८/२०२५

 
एक पक्षी गझल संग्रहाला समरसता साहित्य पुरस्कार बातमी स्वाभिमानी छावा दैनिक ०५/०८/२०२५

एक पक्षी गझल संग्रहाला समरसता साहित्य पुरस्कार बातमी स्वाभिमानी छावा दैनिक ०५/०८/२०२५

‘एक पक्षी’ गझलसंग्रहास समरसता साहित्य पुरस्कार २०२५ जाहीर

 ‘एक पक्षी’ गझलसंग्रहास समरसता साहित्य पुरस्कार २०२५ जाहीर


सतिश मालवे




‘एक पक्षी’ गझलसंग्रहास समरसता साहित्य पुरस्कार २०२५ जाहीर


गझलकार सतिश मालवे यांचा गौरव


नांदेड :

सामाजिक समरसता आणि सर्जनशीलतेचा वारसा जपणाऱ्या समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र यांच्यातर्फे दिला जाणारा ‘समरसता साहित्य पुरस्कार २०२५’ यंदा प्रसिद्ध गझलकार सतिश गुलाबसिंह मालवे यांच्या ‘एक पक्षी’ या गझलसंग्रहाला जाहीर झाला आहे.


साहित्यिक सौंदर्य, सामाजिक भान, आणि आत्मनिष्ठ अनुभवांचे प्रभावी शब्दांकन यामुळे हा संग्रह वाचक आणि समीक्षकांच्या विशेष पसंतीस उतरला आहे. राज्यभरातून आलेल्या शेकडो साहित्य कृतींपैकी ‘एक पक्षी’ ही निवड ठळकपणे केली गेली असल्याची माहिती परिषदेकडून देण्यात आली.


या पुरस्काराचे वितरण २ व ३ ऑगस्ट २०२५ रोजी नांदेड येथे होणाऱ्या २० व्या समरसता साहित्य संमेलन २०२५ च्या उद्घाटन सोहळ्यात करण्यात येणार आहे. परिषदेकडून प्रसिद्ध निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, "साहित्यिक समरसतेचा प्रसार, सामाजिक सलोखा आणि नवोदित लेखकांना प्रोत्साहन देणे, हेच आमचे मुख्य ध्येय आहे."


सतिश मालवे, हे मूळचे अंजनगाव सुर्जी तालुक्यातील मुऱ्हा देवी (जि. अमरावती) येथील असून सध्या शिक्रापूर (पुणे) येथे वास्तव्यास आहेत. ‘सतिशसिंह’ या टोपणनावानेही ते साहित्य वर्तुळात ओळखले जातात. त्यांच्या लेखनशैलीत मातीचा गंध आदिम संस्कृतीचे दर्शन, आणि समकालीन सामाजिक जाणिवांचा प्रत्यय सातत्याने येतो.


या सन्मानानंतर राज्यभरातील साहित्यिक, अभ्यासक आणि रसिक वाचकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

गझलेतील शब्दकळा|सतीश गुलाबसिंह मालवे| साहित्य भरारी साप्ताहिक मधे प्रकाशित lekh

 गझलेतील शब्दकळा|सतीश गुलाबसिंह मालवे| साहित्य भरारी साप्ताहिक मधे प्रकाशित लेख


साहित्य भरारी साप्ताहिक


गझलेतील शब्दकळा : एक शब्दानुभव


— सतिश गुलाबसिंह मालवे


काही दिवसांपूर्वी गझलेतील शब्दांच्या वापराबाबत आदरणीय अनंत ढवळे सरांशी एक अर्थपूर्ण संवाद झाला. त्या संवादाने मनात विचारांची एक नवी खिडकी उघडली. गझलेत शब्दांचा वापर कसा असावा, तो किती सर्जनशील, अर्थवाही आणि संवादी असावा, हे समजून घेण्याच्या दिशेने त्यांनी मला अतिशय बारकाईने मार्गदर्शन केले आणि यावर लिहिण्याचा आग्रहही केला. त्यांच्या त्या विश्वासामुळेच थोडं धाडस करत आहे. हा लेख म्हणजे त्यांच्या विश्वासाला अर्पण केलेली एक नम्र अभिव्यक्ती आणि माझ्या शब्दप्रेमाची साठवण आहे.


गझल ही केवळ शेरांची रचना नसते; ती एक संवेगाची अनुभूती असते. आणि त्या अनुभूतीला योग्य रूप देणारी शक्ती म्हणजे शब्दकळा. शब्द केवळ अर्थ पोहोचवत नाहीत, ते भावना उलगडतात, अनुभव फुलवतात आणि कधी काळजासारखं आत खोलवर पिळवटून टाकतात. म्हणूनच, गझलेतील शब्दांची निवड ही फक्त भाषिक कृती नसते तर एक सर्जनशील प्रक्रिया असते. ही प्रक्रिया म्हणजे आत्म्याच्या गुंजनाला शब्दरूप देण्याची एक प्रक्रिया असते.


आजची गझल प्रेम, विरह, तत्त्वज्ञान, सामाजिक परिवर्तन, ग्रामीण जीवन, शेतकरीजीवन, अस्तित्व, एकाकीपणा आणि अगदी तंत्रज्ञान अशा विविध विषयांपर्यंत पोहोचते. काळाच्या गरजेनुसार ती स्वतःला बदलते. पण या सर्व प्रवासात गझलची खरी ओळख जपून ठेवणारा महत्त्वाचा घटक म्हणजे शब्दकळा!


गझलेतील शब्द हे केवळ अलंकार नसतात तर गझलेचे आत्मस्वरूप असतात. शब्दांचे निवेदन, त्यांचा नाद, त्यांची उंच-सखल लय यामधूनच गझलेतील ‘गझलियत’ जिवंत राहते. योग्य शब्दांची निवड म्हणजे भावनेला दिलेली शुद्ध, सूक्ष्म आणि सौंदर्यपूर्ण वाट असते. अशा शब्दांनी नटलेली गझल केवळ वाचली जात नाही, तर अनुभवली जाते, अंतर्मनात रुंजी घालते आणि अनेकदा वाचकाच्या मौनालाही व्यक्त करत जाते.


मी गझलेतून जे काही शिकत आलो, वाचत गेलो आणि अनुभवत असतो, ते येथे मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे. हे लेखन पूर्ण झालेले नाही, कारण शब्दकळेचा प्रवास कधीच पूर्ण होत नाही. तो दरवेळी नव्याने उमटतो एखाद्या शेरात, एखाद्या मर्मभेदक शब्दात… आणि पुन्हा-पुन्हा आठवण करून देतो की, गझल का लिहावी वाटते, का वाचावी वाटते.


गझलेतील शेरात शब्दांची निवड अशी असावी की ते ऐकता क्षणी मधुर, अर्थपूर्ण आणि मनात ठसणारे वाटावेत. जसे आपण प्रत्येक शेरात आशयानुसार वेगळा काफिया निवडतो, तसा प्रत्येक काफिया रदीफसोबत एक नादसौंदर्य निर्माण करतो. हे नादसौंदर्य गझलेला विशिष्ट लय आणि संगीतमयता प्रदान करत असते.


याचबरोबर गझलेत वापरलेली प्रतीकं आणि अलंकारही तितकेच महत्त्वाचे असतात. काही शेर थेट भिडतात, तर काही शेर सूक्ष्म प्रतिमांमधून बोलतात. त्यामुळे शब्दांत भावनिक खोली असणे अत्यावश्यक ठरते. गझलेतील शब्द जितके साधे, तितकेच गहिरे असतात. एकाच शब्दाला विविध संदर्भांत निरनिराळे अर्थ असतात.

उदाहरणार्थ, “दुःख” हा शब्द प्रेमातील वेदना, एकटेपणा, दुसऱ्याकडून झालेली भावनिक जखम, अथवा मूक वेदना अशा अनेक रूपांत प्रकट होतो. यालाच आपण ‘भावनिक गहराई’ म्हणतो.


आदरणीय अनंत ढवळे सरांचा एक शेर पाहुयात 


"कुणा न दिसली मूक अरण्यातली पानगळ

त्या दुःखाची गाज दूरवर घुमत राहिली


हा शेर एकटेपण आणि दुःखाचे प्रतिनिधित्व करतो. "मूक अरण्यातील पानगळ" आणि "दुःखाची गाज" ही शब्दकळा शेरात एक विशेष भावनिक खोली निर्माण करते. ती एकाकीपणा आणि आंतरिक वेदनेची प्रतीकं बनतात. त्यामुळे वाचक त्यात गुंतून पडतो.


त्याच गझलेतील आणखी एक शेर 

 "कळूनही त्या सरोवराचे गूढ न कळले

प्रतिबिंबांची वलये नुसती हलत राहिली"


हा शेर जीवनाच्या गूढतेवर अत्यंत सूक्ष्म भाष्य करतो. "सरोवर" हे जीवनाचे किंवा मानवी मनाचे प्रतीक वाटते, तर "प्रतिबिंबांची वलये" हे मनातील विचार, भावना वा स्मृतींचे प्रतीक असल्याचे जाणवते. विचार, भावना, आठवणी या कधीच स्थिर राहत नाहीत. सतत हलत राहतात. यातून जीवनातील अंतःस्थ सखोलता शायराने प्रभावीपणे मांडली आहे.


गझलेतील शब्दकळा जर भावनिक, लयबद्ध आणि सौंदर्यपूर्ण असेल, तर ती निश्चितच रसिकांना आपलसं करते. मात्र ती साधी पण प्रभावी असायला हवी.

गझल ही शब्दांची एक सुंदर अनुभूती आहे. तिच्यातून शब्दांच्या शक्यता विस्तारतात आणि वाचकाच्या अंतःकरणात आपलं स्थान शोधतात.

गझलेतील प्रत्येक शब्द हा कविमनाच्या अनुभवांचा आणि भाषिक संवेदनशीलतेचा नकाशा असतो. म्हणूनच गझल पुन्हा पुन्हा ऐकावी वाटते. लिहावी वाटते.


स्व. विजय आव्हाड सरांचा असाच एक शेर पाहुयात 


 "खाटकाचा हात चिरला एक मेंढी कापतांना..

जखम बांधू लागला घायाळ तुकडा लोकरीचा.!.."


हा शेर वाचून कोणीही थक्क होऊन जाईल. यातील प्रतिकांवर विचार केला, तर एकीकडे मेंढीला कापणे ही क्रूरता आहे, तर दुसरीकडे तिच्याच लोकरीने खाटक स्वतःची जखम बांधतो केवढा गहिरा विरोधाभास!


"लोकरीचा तुकडा" हा ऊबदार असतो, ही ऊब स्नेह, माया, करुणा, संवेदना, पश्चात्ताप यापैकी कशाचीही असू शकते.

या शेरातून सूचित होते की, हिंसेतूनही करुणा उगम पावू शकते. खऱ्या अर्थाने या शेरातून मानवी स्वभावाचे दर्शन घडून येते. मागील काही महिन्याआधी शेर म्हणजे एक प्रकारचा सुतळी बॉम्ब हा एक छोटासा लेख मी लिहिला होता तो इथे आठवला त्यात मी लिहिले होते की ज्याप्रमाणे सुतळी बॉम्बाची रचना केलेली असते, त्याच पद्धतीने एक उत्तम गझलचा शेरही तयार केलेला असतो.

शब्दांच्या आवरणात अनेक अर्थांची, आशयांची स्फोटक शक्ती शेरात लपवलेली असते.


शायर त्या आशयाचा एक धागा जणू सुतळी बॉम्बाच्या वातीसारखा शेराबाहेर ठेवतो.

आणि रसिक जर त्याच्या विचारांची माचिस लावली, तर तो विचार स्फोटकपणे उमटतो… एक जबरदस्त "धमाका"!


निसार अख्तर काय सुंदर म्हणतात 


"हम से पूछो ग़ज़ल क्या है, ग़ज़ल का फ़न क्या है

चंद लफ़्ज़ों में कोई आग छुपा दी जाए"


शब्द हेच शायराचे अस्त्र असतात. त्यांच्या सहाय्याने तो "आग" म्हणजेच तीव्र भावना, वैचारिक ठिणग्या, मानवी संवेदना लपवून ठेवतो.

आणि जर त्या शब्दांना विचारांच्या ज्योतीने पेटवले, तर तो शेर आयुष्यभर लक्षात राहील असा स्फोट घडवतो.

गझल म्हणजे फक्त काही दोन-दोन ओळी नाहीत, तर ती एक सूक्ष्म विस्फोटक शक्ती आहे अगदी सुतळी बॉम्बासारखी!

एकदा पेटली... की विसरणं अशक्य!


— सतिश गुलाबसिंह मालवे

अमरावती

हल्ली मुक्काम – शिक्रापूर,पुणे

मो. 9527912625

सतिश गुलाबसिंह मालवे साहित्यिक परिचय

 सतिश गुलाबसिंह मालवे साहित्यिक परिचय


सतिश गुलाबसिंह मालवे साहित्यिक परिचय



सतिश गुलाबसिंह मालवे

मराठी गझलकार | कवी | लेखक


जन्मतारीख: १९ एप्रिल १९८७


“गझल हे माझं आत्मभान – आणि शब्द माझं साधन!”


पत्ता

📍 सध्याचा पत्ता:

माऊली अगरबत्ती मार्ट, स्नेहा अपार्टमेंट, मोती चौक, पोस्ट ऑफिस शेजारी,

शिक्रापूर, ता. शिरूर, जि. पुणे – ४१२२०८

📱 ९५२७९१२६२५


📍 कायमचा पत्ता:

मु.पो. मुऱ्हा देवी, ता. अंजनगाव सूर्जी,

जि. अमरावती – ४४४७०५

📧 Email: satishgmalve@gmail.com

🌐 ब्लॉग: https://gulabigazal.blogspot.com/?m=1

व्यवसाय


ऑपरेटर – Oriental Rubber Industries Pvt. Ltd., शिक्रापूर


साहित्यिक भूमिका

सहसचिव – गझल मंथन साहित्य संस्था, पुणे विभाग

प्रकाशित साहित्य व साहित्यिक योगदान

• मराठी गझलसंग्रह – “एक पक्षी” (२७ एप्रिल २०२५ रोजी प्रकाशित)

• भक्तिगीत संग्रह – “ वळेखन आई माझी पावली नवसाला” (१० गीतांची CD – २०१५)

• ई-पुस्तिका – “वाघरामी रिवाज” (वाघरी संस्कृतीविषयक – २०१५)

• विविध लेखन – गझल, कविता व रसग्रहण लेख विविध दिवाळी अंक व वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित

सन्मान व पुरस्कार

• समाजभूषण पुरस्कार – २०१५

• बंधुता माय मराठी साहित्य पुरस्कार – २०२४


गझल मुशायरे व साहित्य संमेलनातील सहभाग (निमंत्रित)


• ९५ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन – उदगीर

• ८वे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन – रावेरी

• ५वे राज्यस्तरीय युवा मराठी साहित्य संमेलन – अकोला

• गझलोत्सव – कल्याण, अक्कलकोट, मूर्तिजापूर, पुणे

• गझलपुष्प – पिंपरी-चिंचवड

• ब्रह्मकमळ साहित्य संस्था – मुंबई

• विद्रोही साहित्य संमेलने – पुणे व अहमदनगर

• काव्यप्रेमी शिक्षक मंच – पुणे

• इतर अनेक ऑनलाईन व ऑफलाईन मुशायरे

प्रमुख साहित्यिक सहभाग व मुशायरे

• साहित्यदीप प्रतिष्ठान – पुणे

• अखिल भारतीय साहित्य समूह – मुंबई

• ९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन – वर्धा

• अंकुर साहित्य संघ – अकोला

• अखिल भारतीय एल्गार मराठी गझल संमेलन – अंमळनेर व अंबेजोगाई

• ११ वे अखिल भारतीय शेतकरी साहित्य संमेलन – मोहाडी, नाशिक

• विविध ऑनलाईन व ऑफलाईन गझल मुशायरे

संपर्क

📱 ९५२७९१२६२५

📧 satishgmalve@gmail.com

🌐 https://gulabigazal.blogspot.com/?m=1

सतिश गुलाबसिंह मालवे हिंदी शायरी जाने में यहां डर तो नहीं

 सतिश गुलाबसिंह मालवे हिंदी शायरी जाने में यहां डर तो नहीं 

#अर्ज_किया_है 


डूब जाने में यहां डर तो नहीं

प्यार से गहरा समंदर तो नहीं


आपसे मिलने घटाएं बेताब है

बादलोंमें आपका घर तो नहीं


ठोकरें खाना जरूरी है मियां

जिंदगी बेजान पत्थर तो नहीं


यूं लकीरें देखने में क्या भला 

हाथ में अपना मुकद्दर तो नहीं


कर रहे हों शायरीपर गुफ़्तगू

तुम कही मशहूर शायर तो नहीं


— सतिश गुलाबसिंह मालवे

सुप्रसिद्ध गझलकार गिरीश जोशी (गझलगिरीश) यांनी एक पक्षी गझल संग्रहाचे केलेले अप्रतिम समीक्षण

 सुप्रसिद्ध गझलकार गिरीश जोशी (गझलगिरीश) यांनी एक पक्षी गझल संग्रहाचे केलेले अप्रतिम समीक्षण 

एक पक्षी पुस्तक समीक्षण

#एक_पक्षी_ #अभिप्राय

*सुप्रसिद्ध गझलकार श्री.गिरीश जोशी(गझलगिरीश ) सरांनी माझ्या एक पक्षी संग्रहाचे केलेले अतिशय बारकाईने मुद्देसूद मांडणीसह अतिशय सखोल आणि अभ्यासपूर्ण समीक्षण*

___________________________


मराठी गझलेचे अवकाश समृद्ध करणारा *`एकपक्षी `*


सतीश गुलाबसिंह मालवे लिखित 

*एक पक्षी* ह्या नव्या_कोऱ्या गझल संग्रहावर अभिप्राय.


माझे मित्र सतीश मालवे ह्यांचा 

*एक पक्षी* संग्रह प्रकाशित झाल्यापासून वाचायची खूप इच्छा आणि आतुरता होती .वाचनास सुरूवात करताच साजेसे मुखपृष्ठ दिसले.शीर्षकास अनुसरून असणाऱ्या मुखपृष्ठाने संग्रहातील आशयाची कल्पना आली आणि संग्रह वाचण्याची उत्सुकता वाढली.संग्रहातील गझल वाचताना खूप आनंद वाटला.संग्रह वाचल्यानंतर मी माझा प्रामाणिक अभिप्राय नोंदवत आहे..


मातीशी नाळ टिकवून ठेवणारा,नात्यांतील ओल जपून ठेवणारा,शोषिकांच्या प्रश्नांना वाचा फोडणारा, कामगारांच्या संघर्षाची मांडणी करणारा,स्त्री जाणिवांची दखल घेणारा,

गावाची महिमा गाणारा,मैत्रीचा धागा घट्ट विणणारा,समाजातील प्रश्नांवर व्यक्त होणारा आणि स्वतःच्या पंखांवर प्रचंड विश्वास असणारा 

*एक पक्षी* आत्मविश्वासाने भरारी घेतो आणि आपल्या लेखणीच्या बलवान पंखांनी सारं अवकाश काबीज करतो.तो पक्षी म्हणजे कवी, गझलकार सतीश गुलाबसिंह मालवे.एक तरुण तडफदार, संवेदनशील लेखन करणारा गझलकार.


तो आला,त्याने पाहिलं आणि त्याने सारं जिंकूनही घेतलं असं काहीसं सतीश मालवे ह्यांच्याबाबतीत झाले आहे. एक तरुण कवी गझलेच्या प्रेमात पडतो, तिची साधना करत करत गझल क्षेत्रात आपली छाप सोडून जातो.दर्जेदार लेखना बरोबरच,माणूस म्हणूनही आपली प्रतिमा जपता येणे अवघड असते,पण हा समतोल सतीश जी साधताना दिसतात.


रोजच्या जीवनातील खयाल,शेरांना अनुभवाची किनार,विचारात नाविन्य,बोलकी वाक्यरचना, साध्या शब्दांचा वापर,सोपी वाक्य रचना,इतरांच्या प्रभावात न गुंतणारी स्वतंत्र लेखनशैली,तंत्र शरण न जाता आशय संपन्नेतकडे जाणारे लेखन,सामाजिक मूल्ये जतन करणे,संस्कृती संवर्धन करणे तसेच संस्कारक्षम लेखन इत्यादी वैशिष्ट्ये सतीश मालवे ह्यांच्या गझल लेखनात प्रामुख्याने दिसून येतात.


सतीश जी ह्यांचे शेर बहूआयामी आहेत,त्यांच्या शेरांना अद्भुततेची चमक आणि अनुभवाची धार लाभली आहे.हा गझलकार सच्चा लिहितो,म्हणून त्यांचा शेर सर्वांना अच्छा वाटतो.*एक पक्षी* संग्रह वाचत असताना गझलेत नाटकीपणा,शब्दांचा भडीमार,ओढून ताणून आणलेली काफियांची गर्दी दिसून येत नाही.*एक पक्षी* संग्रहातील शेरांची भाषा बोलकी आहे, स्पष्ट आणि मनाला भिडणारी आहे.ह्या संग्रहातील शेर सार्वभौम आहेत.जगातील लोकांच्या अनुभवाशी साधर्म्य सांगणारे लेखन ह्या संग्रहात दिसून येते.केवळ प्रश्नांवर बोट न ठेवता ,थंड डोक्याने त्यावर उत्तरे शोधताना सतीश जी ह्या संग्रहाच्या माध्यमातून दिसून येतात.म्हणूनच सतीशजींची गझल सर्व सामान्यांची गझल म्हणून पुढे येते.


त्यांच्या गझलांच्या शेरात आलेल्या काही ठळक जाणिवा,वैशिष्ट्ये,प्रतिमासृष्टी ह्यांचा थोडक्यात आढावा..


*१) बाप :*

प्रत्येक कवी आपल्या बापावर व्यक्त होत असतो.बाप म्हणजे कवीची हळवी जागा.बापा विषयी व्यक्त होताना सतीश जी लिहितात.


*सोसून झळ उन्हाची दाणे टिपून येतो*

*दिसतो मला निरंतर बापात एक पक्षी.*


*बाप इकडे साफ करतो शासकी मोऱ्या*

*आणि मुलगा आमदारासारखा फिरतो.*



*२)प्रतीकांचा सुयोग्य वापर:*


सतीश मालवे ह्यांच्या गझलेतील एक महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रतीकांची अचूक निवड.ह्यांच्या गझलेतील प्रतीके बोलकी असतात,समर्पक असतात आणि हटके असतात.ही प्रतीके गझलांना साज चढवताना दिसतात.याचेच एक उदाहरण,


*दशा माझ्या मनाचीही समुद्रासारखी व्हावी*

*मनापासून एखादी नदी भेटून गेल्यावर.*



*३) संघर्ष :*

सतीशजींच्या गझलेत वेळोवेळी संघर्ष दिसून येतो.सामान्य लोकांच्या जीवनात जो असतो तो संघर्ष. पोटा पाण्यासाठी शहरात येऊन केलेला संघर्ष, संसार फुलवण्यासाठी केलेला संघर्ष,मनातील भावभावनांचा संघर्ष,समाजातील व्यवस्थेविरुद्ध केलेला संघर्ष इत्यादी विषयी सतीशजी गझलेतून व्यक्त होताना दिसतात.


*किती विजांशी आधी लढला होता*

*नंतर कोठे तो कोसळला होता.*


*ओझे त्याला ओझे वाटत नाही*

*कारण त्याने भार पेलला होता*



*४) जबाबदारीची जाणीव:*


सतीश मालवे ह्यांच्या गझलेत जबाबदारीची जाणीव दिसून येते.मुलगा हा नात्याने,पती ह्या नात्याने,बाप ह्या नात्याने,कामगार ह्या नात्याने,मित्र ह्या नात्याने ,कवी ह्या नात्याने सतीशजी त्यांच्या सोबत साऱ्या सामान्य लोकांच्या जबाबदाऱ्या गझलेतून मांडताना दिसतात.


*फुलाप्रमाणे जगवायची इच्छा झाली तेव्हा*

*का काट्यांनी चोहीकडुनी गस्त घातली आहे?*



*५) आशावाद पेरणारी गझल:*


सतीशजी ह्यांची गझल कमालीचा आशावाद पेरते.संकट समोर असताना हातावर हात ठेवून बसण्यापेक्षा जिद्द,चिकाटीने त्यास सामोरे जाणारी ह्यांची विचार शैली ह्या रचनांमधून पहायला मिळते.


*पर्वतांनो आडवे येऊ नका*

*मार्ग माझा काढणे जमते मला.*


*येईल का दऱ्यांचा अंदाज आपल्याला*

*या जीवनात आला जर चढ उतार नाही.*


*मी जरीही पायथ्याशी राहतो आहे*

*मी चढू शकतो तुझ्यावर डोंगरा आता.*


*येवोत कोणतेही अवघड प्रसंग आता*

*हत्यार मी बनवले आहे भयास माझ्या*


*कधीचे अंबराला सांगतो आहे*

*फुटू दे पंख..मग उडणार आहे मी.*



*६) वास्तवाचे भान जपणारी गझल :*


सतीश मालवे ह्यांची गझल म्हणजे हवेत इमले बांधणारी गझल नव्हे, तर वास्तवाचे भान जाणणारी आहे. जे आहे ते दाखवणारी गझल सतीशजी लिहितात. विदेशात जाऊन ,बक्कळ पैसा कमावणाऱ्या आणि देशाला विसरलेल्या तरुणांना उद्देशून ते लिहितात.


*मायभूमीची कुणाला ओढ नसल्याने*

*प्राण तळमळतो कुणाचा सागरा आता*


स्पष्ट आणि थेट अधिकारवाणीने बोलणारी त्यांची गझल आपली वाटते.


*लख्ख आधी कर चराचर*

*मग स्वतःला म्हण प्रभाकर*


*काय दाखवशील तू रस्ता मला*

*बांधली पट्टी तुझ्या डोळ्यांवरी*


*७) वेगळी शैली:*

कुणाच्याही प्रभावात न येता स्वतःची वेगळी शैली सतीश ह्यांनी जपली आहे .ह्याविषयी व्यक्त होताना ते लिहितात.


*मला वेगळेपण जपू द्या स्वतःचे*

*नका येत जाऊ प्रभावात माझ्या*


*८) अनुभवाची किनार :*

सतीशजींच्या गझलेतील शेर अनुभवाची किनार घेऊन जन्मास येतात.जसे,


*एक मुलगा कामधंदा शोधतो आहे*

*एक मुलगा काम नसल्यासारखा फिरतो*


*शहरामधे राहूनही जपतात माणुसकी किती*

*शहरात गावासारखी असतात काही माणसे*


*अंधार दूर होतो सूर्या तुझ्यामुळे.. पण!*

*माझी पहाट झाली पाटी नि पुस्तकाने*


*तुझ्या जीवनाची कथा वाचली*

*तशी हुंदक्यांची गती वाढली*


*९) विरोधाभासातून वास्तविकतेकडे नेणारी गझल:*


सतीश मालवे ह्यांचा गझलेतील मिसरे विरोधाभास दाखवतात त्याच वेळी वास्तविकतेचे दर्शनही घडवतात.उदाहरणासाठी खालील शेर वाचावा.


*झोपडी पाहिल्यावरी माझी*

*एक वाडा दुखावला होता*


सतीशजी ह्यांच्या गझलेत त्याग भावना दिसून येते.त्यातूनच प्रेरणादायी ओळी जन्मास येतात.


*मन लगोलग कुठे कमळ बनले*

*देह चिखलात ठेवला होता*


*१०) वेगळ्या खायालांचा धनी:*


सतीश ह्यांची गझल वेगळी आहे.खयालांचे वेगळेपण त्यांच्या गझलेत दिसून येते.तोच तो पणा दिसून येत नाही.हे सांगताना ते स्पष्ट करतात.


*वैशिष्ट्य या गझलचे एवढेच की*

*सगळे खयाल जगण्यातून घेतले*


*तुला आश्वासनांवर ठेवतो आहे*

*जरा समजून घे सरकार आहे मी*


*११) आयुष्याला दुनियादारी शिकवणारा गझलकार:*


सतीश जी आयुष्यालाच दुनियादारी शिकवतात.आयुष्याची समजूत घालताना ते लिहितात,


*जो जन्मला त्याचे मरण सुद्धा अटळ आहे*

*आले न कोणीही अमर होण्यास आयुष्या*


*१२) व्यथा,दुःख,वेदनेचा गौरव करणारा कवी:*


सतीश ह्यांचा गझलेच्या शेरांतून मानवी व्यथा,दुःख,वेदनेचा दुखवटा साजरा केला जात नाही तर ते ह्या भावनांची ओटी भरतात, त्यांचा गौरव करतात.


*पिकल्यात काळजाच्या शेतात वेदना*

*वाटू कशा तुम्हाला फुकटात वेदना*


*दिसतो वरून अवघा मी कोरडा जरी*

*आतून ओल मजला देतात वेदना*


*आधी व्यथा सोसून घे बाकी बघू पुढचे पुढे*

*दुःखास कवटाळून घे..बाकी बघू पुढचे पुढे*


*१३) गावाची ओढ ,गावपण जपणारा कवी:*


सतीश मालवे हे गावच्या कसदार मातीतले कवी आहेत.गावाची ओढ,गावाविषयी तळमळ,मनात हिरवे गाव जपणारा हा कवी गावाविषयी सतत व्यक्त होताना दिसतो.


*एवढे कळले तुझ्या शहरात येउन*

*माणसे साधीसुधी गावात होती.*


*एकदा गावाकडे बोलव मला तू*

*हे शहर तात्काळ मी सोडून येतो*


*वऱ्हाडी बाज माझा ठेवला कायम*

*जरी सांगायला आहे ‘पुणेकर’ मी*


*१४) मातीशी नाळ जपलेला कवी:*


गझलेमुळे मान सन्मान लाभलेला,गझल क्षेत्रात नावारूपास आलेला असला तरी हा गझलकार हवेत उडत नाही तर मातीशी इमान राखतो,पाय जमिनीवर ठेवतो.


*जरी विहरतो हवेत आम्हीही .पण,*

*जमीन अमुच्या पायाखाली आहे*


*१५) स्त्री शक्तीचा गौरव करणारे शेर:*


*सतीश ह्यांच्या गझलेतील स्त्री* *शक्तीचा गौरव होताना दिसतो.*


*तिने खोचला पदर असा की*

*क्षणात मागे फिरले वादळ*


*उभा जन्म काट्यात गेला तरीही*

*फुलासारखी छान दिसतेस बाई*


*मला सर्व पाषाण समजायचे*

*तिने मूर्त माझ्यात साकारली*


*१६) गझलेविषयी कृतज्ञता :*


सतीश जी गझलेविषयी वेळोवेळी कृतज्ञता व्यक्त करतात.आपल्या गझलेचा सन्मान कसा राखता येईल ह्याकडे ते जाणीवपूर्वक लक्ष देतात. गझलेवर त्यांचे प्रचंड प्रेम आहे.


*मी विधा जशी केली आत्मसात गझलेची*

*जीवनामध्ये आली चांदरात गझलेची.*


*सोबती जरी माझ्या राहतोस अंधारा*

*तेवते मनामध्ये प्राणवात गझलेची*


*लेकरागत मी तिला बिलगुन बसतो*

*वाटते हल्ली गझल आईप्रमाणे*


*१७) पिंडी ते ब्रम्हांडी:*

सतीश जी आत जसे आहेत तसेच बाहेरही आहेत.जे आहे तेच गझलेत दिसून येते.कुठलाही मुखवटा लावून वावरणारा हा व्यक्ती नाही.


*विस्तार फक्त माझा यानेच शक्य झाला*

*मी संकुचित कधीही केला विचार नाही*


*होऊ नये अनादर माझ्याकडून त्यांचा*

*नावासमोर ज्यांच्या सन्माननीय आहे*


*१८) कामगारांची व्यथा मांडणारा कवी:*


सतीश जी कामगारांची व्यथा,त्यांचे प्रश्न मांडत असतात.कामगारांची झालेली कोंडी,कामगारांचे प्रश्न ते उपस्थित करतात आणि काही अंशी त्यांची उकल शोधण्याचे प्रयत्न ते करतात. 


*कशी सांग वारी करू पंढरीची*

*तिन्ही सांज मी कारखान्यात असतो*


*१९) साधेपणा:*


सतीश ह्यांच्या गझलेत साधेपणा दिसून येतो.

म्हणूनच खरेपणा आपसुकच येतो.


*तुझ्या गादी दुलाईची मला येथे गरज नाही*

*मला रेल्वे फलाटावर सुखाने झोपता येते*


*२०) वेगळेपणा:*


सतीश ह्यांची गझल वेगळी आहे.तिचा बाज वेगळा आहे..म्हणूनच हा वेगळेपणा वाचकांना आवडत असतो.


*टांगता आली न भिंतीवर घराच्या*

*एक प्रतिमा काळजाच्या आत होती*


*सागरामध्ये मिळावे स्थान त्यांना*

*याचसाठी भांडल्या त्या संगमावर*


*गुलाबी गुलाबी तुझे ओठ बघता*

*मला वाटले तेच जयपूर होते*


*उतरल्याने विठू गझलेत माझ्या*

*मला इंद्रायणीवर शेर सुचले*


*छान गोळ्या घालता आल्यात त्यांनाही*

*घेतली बंदूक तू असणार खांद्यावर*



मराठी गझलेवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने हा संग्रह वाचावा आणि संग्रही ठेवावा असा झाला आहे.या संग्रहात एकूण ९० गझलांची मेजवानी वाचकांना मिळणार आहे.*गझल मंथन प्रकाशन* संस्थेने देखणा संग्रह वाचकांच्या हाती दिला आहे.ह्या संग्रहाचे स्वागत मूल्य *२०० रुपये* असून. हा संग्रह ऑनलाईन उपलब्ध आहे.स्वतः गझलकार *सतीश मालवे* किंवा *गझल मंथन प्रकाशन* संस्थेद्वारे आपण मागवू शकता. संग्रहासाठी सतीश मालवे यांचा संपर्क (9527912625) यावर आपण मॅसेज किंवा कॉल करावा.


सतीश मालवे लिखित *` एक पक्षी `* ह्या गझल संग्रहाला वाचकांचे प्रचंड प्रेम लाभावे,ह्या संग्रहास गझल क्षेत्रातील अनेकविध सन्मान मिळावेत.सतीश मालवे ह्यांची प्रतिभाशक्ती उत्तरोत्तर बहरत जावी , अशी प्रार्थना ईश्वर चरणी करतो.

सतीश मालवे आपणास पुढील दैदिप्यमान प्रवासासाठी अनंत शुभेच्छा..


*— गिरीश शाम जोशी.*

*‘गझलगिरीश’*

छत्रपती संभाजी नगर

संपर्क

*९२२६७५०६२१.*